नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘सरळसेवा भरती २०२५-२६’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेली ऑनलाइन स्पर्धा परीक्षा मंगळवारी (२२ जुलै) कोणताही अनुचित प्रकार न घडता यशस्वीरीत्या पार पडली. भरती प्रक्रियेच्या दोन दिवसांच्या टप्प्यात सहा संवर्गांतील ३६ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली असून, काटेकोर नियोजन, अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासकीय देखरेखीमुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सुव्यवस्थित झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील पवई येथील परीक्षा केंद्रांवर दोन सत्रांमध्ये ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. सकाळी ९ ते ११ या सत्रात ५८८ उमेदवार, तर दुपारी १ ते ३ या सत्रात ४२२ उमेदवारांनी परीक्षा दिली. अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी एकूण १,०१० उमेदवार परीक्षेला उपस्थित होते. यापूर्वी सोमवार (२१ जुलै) रोजी राज्यातील सहा जिल्ह्यांतील १३ परीक्षा केंद्रांवर तीन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. दोन दिवसांच्या या प्रक्रियेद्वारे विविध संवर्गांतील पदांसाठीची परीक्षा नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली. नवी मुंबई महापालिकेच्या या भरती प्रक्रियेसाठी सहा संवर्गांतील ३६ पदांसाठी एकूण १८ हजार ९३० अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले होते. मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज केल्यामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली. परीक्षा घेण्याची जबाबदारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांच्याकडे सोपविण्यात आली होती. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भरती प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. यासाठी वर्ग-१ दर्जाचे आठ समन्वय अधिकारी आणि १३ केंद्र निरीक्षक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रत्येक केंद्राला भेट देऊन आवश्यक सुविधा, संगणकीय यंत्रणा, सुरक्षा व्यवस्था आणि अन्य तांत्रिक बाबींची पाहणी करून सर्व तयारीची खातरजमा केली होती.
भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त राहावी यासाठी परीक्षा केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच ऑनलाइन परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्या मान्यतेने सर्व परीक्षा कक्षांमध्ये मोबाईल जॅमर बसविण्यात आले होते. त्यामुळे मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून गैरप्रकार करण्याची शक्यता पूर्णपणे रोखण्यात आली. उमेदवारांना कोणताही अडथळा न येता परीक्षा देता यावी यासाठी आवश्यक तांत्रिक सहाय्य आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. दरम्यान, नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली कोणीही आर्थिक मागणी करत असल्यास किंवा भरती प्रक्रियेबाबत आमिष दाखवत असल्यास अशा व्यक्तींविरोधात तात्काळ स्थानिक पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. तसेच अफवा, खोट्या माहिती किंवा सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवता भरती प्रक्रियेबाबतची अद्ययावत आणि अधिकृत माहिती केवळ नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि अधिकृत समाजमाध्यम खात्यांवरूनच घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. पारदर्शक, निष्पक्ष आणि गुणवत्तेच्या आधारे भरती प्रक्रिया राबविण्याचा महापालिकेचा निर्धार कायम असल्याचे प्रशासनाने यावेळी अधोरेखित केले.

