रेल्वे ही प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. ह्यामुळे लाखो प्रवाशी आपली उपजीविका भागवित असतात. ती ऊन, पावसाळा, वादळ,वारा, असो । तरी देखील प्रवाशांची सेवा करीत असते. तिच्याकडे कसलाही भेद नाही. अगदी गुण्यागोविंदाने प्रवाशांसाठी धडपड असते. अगदी नको त्या संकटांशी सामना करून प्रवाशांची काळजी घेते. अशा रेल्वेच्या दिमतीला रेल्वे सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे. हे रेल्वे सुरक्षा दल रेल्वेच्या संपूर्ण मालमत्तेची काळजी घेते. त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेऊन गुन्हेगारी प्रवृत्ती विरोधात कठोर कारवाई करीत असते. असे हे रेल्वे सुरक्षा दल केंद्र शासनाच्या अधिन राहून कार्यरत असते. अशा रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांची काळजी केंद्र शासन घेते. त्यांच्या सुख सुविधांची काळजी घेते. त्यांची कार्यालये अद्यावत करून त्यांना अधिकाधिक सुविधा कशा देता येईल? यासाठी नेहमी पुढाकार घेत असते. हीच भावना रेल्वे लोहमार्ग पोलीस दलासाठी घेतली पाहिजे ही रास्त अपेक्षा आहे. कारण जसे रेल्वे पोलीस दल प्रवाशांच्या जिवितांचे आणि रेल्वेच्या संपूर्ण मालमतेची काळजी वाहते तशी काळजी रेल्वे लोहमार्ग पोलीस दलाची घेतलीच पाहिजे. त्यांनाही अद्यावत सुखसुविधा पुरविल्या पाहिजेत. त्या सुखसुविधा पुरविल्या न गेल्याने त्यांना अनेक संकटांना, समस्यांना सामोरे जावे लागते आहे.
जसे कि, टिळकनगर टर्मिनल्सं येथे नव्याने झालेल्या पोलीस ठाण्याची अवस्था दयनीय आहे. तेथील पोलीस जवानांना कसलीही सुखसुविधां नाही. महिला पोलिस जवान आहेत त्यांना कपडे बदलण्यासाठी जागा नाही. तसेच प्रसाधनगृहाची सोय नाही. याशिवाय त्या पोलीस ठाण्याची निर्मित्ती ही कंटेनरमध्ये केली आहे. त्यामुळे त्याठिकाणी श्वास घेण्यासाठी जीव गुदमरला जातो अशी ही पोलीस ठाण्याची दयनीय अवस्था आहे. तशीच अवस्था वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याची आहे हे पोलीस ठाणे फ्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ च्या जागी वसलेले आहे. ह्या प्लॅटफॉर्मवरून सीएसटीवरून पनेवल आणि पनवेलहून सीएसटीकडे येणाऱ्या -जाणाऱ्या गाड्यांमुळे हे पोलीस ठाणे हादरते. अर्थात न जाणून, एखादी अनुचित घटना घडली तर त्या पोलीस ठाण्यातील कित्येक पोलीस जवानांचे बळी जाऊ शकतील याचा विचार जरी येऊन गेल्यावर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. थोडक्यात रेल्वे प्रशासनाने रेल्वे पोलीस दलाची जशी काळजी घेते तशीच काळजी रेल्वे लोहमार्ग पोलीसांची घ्यावयांस नको काय? त्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे. रेल्वे पोलीस दल जसे काम करते तसेच काम रेल्वे लोहमार्ग पोलीस दल करीत असते. अशी प्रवाशांची, रेल्वेची काळजी घेणाऱ्या दलाची दयनीय अवस्था कधी बदलणार ? हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहात नाही. ही दयनीय अवस्था असूनही वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याला आगीतून उठलो आणि फुफाटयात सापडलो असे वाटू लागले आहे. त्याचे कारण असे की, ज्या जागी हे पोलीस ठाणे स्थलांतरीत होऊ पाहते आहे ती जागा ही भयावह आहे. मग, रेल्वे प्रशासनाने ह्या ज्या समस्यांच्या शोध घेऊन त्या समस्यांचा निपटारा केला पाहिजे. कारण आग लागल्यानंतर बंब नेण्यात अर्थ नसतो. ती आग लागूनच नये म्हणून सतर्क राहून त्या समस्यांचा नायनाट केला पाहिजे. आणि ह्या समस्यांचा नायनाट न होता त्या अधिक जटिल होत असतील तर रेल्वे प्रशासनाला जाग कधी येणार? असे म्हटल्याशिवाय राहावत नाही. त्यासाठी रेल्वे मंत्री महोदयांनी, रेल्वे महाव्यवस्थपकांनी पाहणी दौरा करून ह्या समस्यांचा नाश केला पाहिजे. तर आणि तरच त्या समस्या संपल्या जातील, अन्यथा समस्यानी आक्राळविक्राळ रूप धारण केले तर मग काही खरे नाही एवढे मात्र निश्चित.

