मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवासादरम्यान जर एसटी बस नादुरुस्त झाली किंवा तिचा अपघात झाला, तर प्रवाशांना त्याच तिकिटावर मार्गावरील उपलब्ध असलेल्या कोणत्याही एसटी बसने प्रवास पूर्ण करता येणार आहे. यासाठी प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
एसटी महामंडळाच्या नियमानुसार, बस वाटेत बंद पडल्यास प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करून देणे ही महामंडळाची जबाबदारी आहे. मग ती बस साधी (लाल परी) असो, निमआराम, शिवशाही, ई-शिवाई किंवा शिवनेरी असो; प्रवासी मूळ तिकीट दाखवून पुढच्या येणाऱ्या कोणत्याही बसमध्ये चढू शकतात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे की, अशा परिस्थितीत प्रवाशांना प्रवेश नाकारणाऱ्या किंवा जादा भाडे मागणाऱ्या चालक-वाहकांवर कठोर शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळालेल्या सवलतीमुळे प्रवाशांची संख्याही वाढली आहे. अशा स्थितीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. विशेषतः पुणे-सोलापूर आणि मुंबई-कोल्हापूर यांसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गावरील विनावाहक एसी बसमध्येही प्रवाशांना जागा उपलब्ध असल्यास सामावून घेणे आता अनिवार्य असेल.

