ठाणे : ठाणे शहरातील पदपथ फेरीवालामुक्त करण्यासाठी महापालिकेने अतिक्रमणविरोधी मोहिमेला अधिक वेग दिला आहे. महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार सोमवारी रात्री उशिरापर्यंत वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली. प्रभाग क्रमांक ४ अंतर्गत गांधीनगर, वसंत विहार सर्कल, काशिनाथ घाणेकर सर्कल ते निळकंठ रोड या परिसरातील पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून नागरिकांसाठी मार्ग मोकळा करण्यात आला.
या कारवाईत चार हातगाड्या, एक पानटपरी, चार लाकडी टेबल आणि १२ लाकडी शेड हटविण्यात आले. हातगाड्यांवरही नियमानुसार कारवाई करण्यात आली. फेरीवाल्यांनी पदपथांवर केलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत होते, तसेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही धडक मोहीम राबवली. शहरातील सर्व पदपथ नागरिकांसाठी मोकळे ठेवण्याबाबत सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधींनीही मागणी केली होती. अतिक्रमण उपायुक्त जितेंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत उपआयुक्त मनीष जोशी, दिनेश तायडे (परिमंडळ-३), सहाय्यक आयुक्त गणेश चौधरी यांच्यासह वर्तकनगर प्रभाग समिती आणि अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. महापालिकेच्या पथकाने ११ एमएसएफ जवान, १४ कामगार, दोन टेम्पो आणि एका जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण परिसरातील अतिक्रमणे हटवली. अनधिकृत हातगाड्या, पानटपऱ्या, लाकडी टेबल आणि शेड हटवून पदपथ आणि रस्ते नागरिकांच्या वापरासाठी खुले करण्यात आले. महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी संबंधित परिसरावर नियमित देखरेख ठेवली जाईल. दैनंदिन पाहणी करून आवश्यकतेनुसार तातडीने कारवाई करण्यात येणार असून, शहरातील रस्ते आणि पदपथ कायमस्वरूपी फेरीवालामुक्त ठेवण्यासाठी अतिक्रमणविरोधी मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. प्रशासनाने नागरिकांनाही सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणाबाबत माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

