मुंबई : अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी धडक कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत मालाड येथील प्रसिद्ध दिल्ली स्वीट अँड भेळपुरी हाऊस आणि कुर्ल्यातील गुलझार मोहम्मदी हॉटेल या दोन आस्थापनांचे अन्न परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे मुंबईतील हॉटेल आणि खाद्य व्यवसायात मोठी खळबळ उडाली आहे. मालाड (पश्चिम) येथील स्टेशन रोडवरील दिल्ली स्वीट अँड भेळपुरी हाऊसमध्ये एफडीएच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला असता अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. अन्न तयार करण्यासाठी तसेच स्वच्छतेसाठी वापरले जाणारे पाणी अशुद्ध असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. तयार समोसे उघड्यावर ठेवण्यात आले होते, तर कोणतेही लेबल नसलेले पनीर आणि वापराची मुदत नमूद नसलेला लस्सीचा साठाही अधिकाऱ्यांनी जप्त केला. अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या दुकानाचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला. याशिवाय संबंधित अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून पुढील अहवालानुसार अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कुर्ल्यातील प्रसिद्ध गुलझार मोहम्मदी हॉटेलमध्येही एफडीएने मोठी कारवाई केली. तपासणीदरम्यान हॉटेलची स्वच्छता अत्यंत खराब असल्याचे आढळले. एफडीएच्या अन्न सुरक्षा मूल्यांकनात या हॉटेलला ८८ पैकी केवळ २४ गुण मिळाले, जे अत्यंत धोकादायक श्रेणीत मोडतात. स्वयंपाकघर, अन्न साठवणूक विभाग आणि इतर परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता तसेच झुरळांचा प्रादुर्भाव असल्याचे अधिकाऱ्यांनी नोंदवले. त्यामुळे या हॉटेलचे अन्न नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले असून अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वितरणावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात अन्न सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू केली असून नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही आस्थापनाला माफी दिली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. “स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, उपाहारगृहे आणि मिठाई विक्रेत्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले. एफडीएच्या या धडक मोहिमेमुळे शहरातील इतर खाद्य व्यवसायिकांमध्येही खळबळ उडाली असून सर्वांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

