मुंबई : सार्वजनिक ठिकाणे अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने सुमीत फॅसिलिटीजतर्फे वरळी समुद्रकिनारा आणि कोळीवाडा परिसरात दोन दिवसीय विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. १ आणि २ सप्टेंबरदरम्यान झालेल्या या मोहिमेत समुद्रकिनाऱ्यासह अंतर्गत गल्ल्या, वारंवार कचरा साचणारी ठिकाणे आणि सार्वजनिक जागांची व्यापक साफसफाई करण्यात आली. या मोहिमेत २०० हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी १० पर्यवेक्षक आणि २ व्यवस्थापक नियुक्त करण्यात आले होते. संपूर्ण परिसराचे विविध विभाग करून प्रत्येक विभागाची जबाबदारी स्वतंत्र पर्यवेक्षकांकडे सोपविण्यात आली. कचरा संकलन व वाहतुकीसाठी प्रत्येकी २ टन क्षमतेची टिपर वाहने, ई-रिक्षा तसेच इतर यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. गवत वाढलेल्या भागांमध्ये मशीनच्या साहाय्याने गवत कापण्यात आले, तर नागरिकांच्या सोयीसाठी परिसरात १२० लिटर क्षमतेच्या कचरापेट्याही ठेवण्यात आल्या.
या मोहिमेदरम्यान सुमारे ५० टन कचरा हटविण्यात आला. पहिल्या दिवशी सुमारे ३० टन, तर दुसऱ्या दिवशी १५ ते १६ टन कचरा संकलित करण्यात आला. समुद्रकिनाऱ्यावर साचलेला प्लास्टिक कचरा, इतर घनकचरा, अंतर्गत गल्ल्यांमधील घाण तसेच वारंवार कचरा साचणाऱ्या ठिकाणांची विशेष स्वच्छता करण्यात आली. संकलित कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्यावरही भर देण्यात आला. या मोहिमेची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती सचिन अहिर यांनी वरळी समुद्रकिनारा आणि कोळीवाडा परिसराला भेट देत कामाची माहिती घेतली व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. सुमीत ग्रुप एंटरप्रायझेसचे कार्यकारी अध्यक्ष सुमित साळुंके यांनीही मोहिमेची पाहणी करून स्वच्छ महाराष्ट्र आणि स्वच्छ भारत अभियानाला हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले. सामाजिक बांधिलकी जपत स्थानिक नागरिकांना स्वच्छ व निरोगी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी अशा मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जुहू समुद्रकिनाऱ्यावर यापूर्वी राबविण्यात आलेल्या सीएसआर स्वच्छता उपक्रमाच्या पुढील टप्पा म्हणून वरळीतील ही मोहीम आयोजित करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
