वृत्तसंस्था : नेपाळमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुराचा फटका आता बिहारच्या उत्तरेकडील भागाला बसू लागला आहे. त्रिशूली, गंडक आणि कोसी या नद्यांमधून आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अनेक भाग जलमय झाले असून, या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात अनोळखी आणि संभाव्य विषारी मासेही वाहून आल्याचे समोर आले आहे. या माशांचे सेवन केल्यानंतर काही नागरिकांची प्रकृती बिघडल्याच्या घटना समोर आल्याने बिहार सरकारच्या पशु व मत्स्य संसाधन विभागाने तातडीने इशारा जारी केला आहे. पूरग्रस्त भागातून पकडलेले मासे पकडणे, विक्री करणे किंवा खाणे यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी पुराच्या पाण्यातून किंवा नदीतून वाहून आलेले वेगळ्या आकाराचे, अनोळखी मासे अजिबात खाऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत. संबंधित विभागाकडून खात्री झाल्याशिवाय कोणत्याही अनोळखी जलचराचे सेवन करू नये, असेही सांगण्यात आले आहे. पूरग्रस्त भागातील माशांची खरेदी-विक्री पूर्णपणे टाळावी, तसेच मासे खाल्ल्यानंतर उलट्या, जुलाब, पोटदुखी, चक्कर येणे किंवा श्वास घेण्यास त्रास अशा प्रकारची लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय, नदी किंवा पुराच्या पाण्यात असामान्य किंवा संशयास्पद मासे आढळल्यास त्वरित स्थानिक मत्स्य अधिकारी किंवा जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, तज्ज्ञांच्या मते महापुरामुळे तलाव, नद्या आणि धरणांतील मासे बाहेर पडून दूषित पाण्याच्या संपर्कात आले आहेत. पुराच्या पाण्यात मृत जनावरे, सांडपाणी, मानवी अवशेष, रासायनिक घटक तसेच विविध प्रकारचे जीवाणू आणि विषाणू मिसळल्यामुळे हे मासे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. याशिवाय नेपाळमध्ये झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात माती, दगड, झाडांचे ओंडके, तुटलेल्या पुलांचे अवशेष, वाहने आणि घरगुती साहित्यही नद्यांमध्ये वाहून आले असून त्यामुळे नदीपात्रातील प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त भागातील नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, अनोळखी मासे खाण्याचा मोह टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थितीवर मत्स्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे पथक सतत लक्ष ठेवून असून पाण्याची गुणवत्ता आणि जलचरांची तपासणी सुरू आहे. जनतेच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असून परिस्थिती सामान्य होईपर्यंत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही बिहार सरकारने स्पष्ट केले आहे.

