मुंबई : देशभरात चिकनपॉक्स अर्थात कांजण्यांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी निरीक्षण नोंदवले आहे. विशेषतः ऋतू बदलाच्या काळात तसेच शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी वाढलेल्या संपर्कामुळे हा संसर्ग झपाट्याने पसरत असल्याचे सांगितले जात आहे. Chickenpox हा व्हेरिसेला-झोस्टर व्हायरसमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य आजार असून संक्रमित व्यक्तीच्या फोडांमधून, पुरळीतून तसेच खोकला किंवा शिंकांद्वारे हा विषाणू इतरांमध्ये पसरतो. विशेष म्हणजे, अंगावर पुरळ येण्यापूर्वीही संक्रमित व्यक्तीकडून संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी या आजाराचा प्रसार रोखणे अधिक कठीण ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या या आजाराचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांमध्ये दिसून येत असला तरी किशोरवयीन आणि प्रौढांमध्येही संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. प्रौढांमध्ये हा आजार अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकतो. त्यामध्ये जास्त ताप, तीव्र वेदना, अशक्तपणा आणि बरे होण्यासाठी अधिक वेळ लागण्याची शक्यता असते.
डॉक्टरांच्या मते, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले रुग्ण, कर्करोग किंवा मधुमेहग्रस्त व्यक्ती तसेच लसीकरण न झालेली मुले यांना चिकनपॉक्समुळे गंभीर गुंतागुंत होण्याचा अधिक धोका असतो. ताप, थकवा, डोकेदुखी, अंगदुखी आणि खाज येणारे लाल पुरळ ही या आजाराची सामान्य लक्षणे आहेत. पुढे हे पुरळ पाण्याने भरलेल्या फोडांमध्ये बदलतात. पुरळ येण्याच्या एक-दोन दिवस आधीपासून ते फोड पूर्णपणे सुकून जाईपर्यंत रुग्ण इतरांना संसर्ग पसरवू शकतो. तज्ज्ञांनी संक्रमित व्यक्तींना वेगळे ठेवणे, नियमित हात धुणे, फोड खाजवणे टाळणे आणि वेळेवर लसीकरण करणे या उपाययोजना प्रभावी ठरू शकतात असे सांगितले आहे. श्वास घेण्यास त्रास होणे, दीर्घकाळ ताप राहणे, गोंधळल्यासारखे वाटणे, डिहायड्रेशन किंवा त्वचेवर गंभीर संसर्ग दिसल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक असल्याचा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे. डॉ. मुर्तजा एस. बागवाला, Head of Emergency Medical Services, Saifee Hospital यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
