मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत गंभीर बाब देशाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांच्या अहवालातून समोर आली आहे. संसदेत सादर करण्यात आलेल्या या अहवालात रेल्वे स्थानकांवरील स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि मूलभूत प्रवासी सुविधांबाबत अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. विविध रेल्वे झोनमध्ये प्रवासी सुविधांच्या नियमांचे योग्य पालन न झाल्यामुळे अनेक स्थानकांवरील वॉटर कुलरच्या पाण्यात घातक ई-कोलाय (E. coli) जिवाणू आढळल्याचे ऑडिटमध्ये स्पष्ट झाले आहे. कॅगने देशभरातील ५१२ नॉन-सबरबन रेल्वे स्थानकांवरील प्रवासी सुविधांचा सखोल आढावा घेतला असता ही धक्कादायक माहिती समोर आली. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा या स्थानकांवरील वॉटर कुलरच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये ई-कोलाय जिवाणू आढळल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय दक्षिण रेल्वेतील कोईम्बतूर आणि पलक्कड जंक्शन, दक्षिण मध्य रेल्वेतील हैदराबाद तसेच पूर्व रेल्वेतील मधुपूर स्थानकावरील पाण्याचे नमुनेही दूषित असल्याचे आढळले. एवढेच नव्हे, तर सहा रेल्वे झोनमधील तब्बल ५९ स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची आवश्यक जैविक तपासणीच करण्यात आली नसल्याचेही कॅगच्या निदर्शनास आले. प्लॅटफॉर्मवरील नळांच्या पाण्याची परिस्थितीही चिंताजनक असल्याचे अहवालात म्हटले आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात ४९ स्थानकांवर, तर २०२३-२४ मध्ये ५६ स्थानकांवरील पाण्याच्या नमुन्यांमध्ये एकूण कोलिफॉर्म्स जिवाणू आढळले. यामुळे प्रवाशांना पुरवले जाणारे पिण्याचे पाणी सुरक्षिततेच्या निकषांवर खरे उतरत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
कॅगच्या अहवालात रेल्वे स्थानकांवरील मूलभूत सुविधांच्या कमतरतेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. रेल्वे बोर्डाने ऑगस्ट २०१८ पर्यंत सर्व स्थानकांवर किमान आवश्यक प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, तपासणी करण्यात आलेल्या ५१२ स्थानकांपैकी तब्बल ४५८ स्थानके म्हणजेच ८९ टक्क्यांहून अधिक स्थानके अद्यापही त्या निकषांची पूर्तता करू शकलेली नाहीत. प्रवासी सुविधा व्यवस्थापन प्रणालीच्या विश्लेषणानुसार देशातील २,०३५ स्थानकांवर पिण्याच्या पाण्याच्या नळांची कमतरता आहे. तसेच ४०३ स्थानकांवर मुतारींची, तर २०१ स्थानकांवर शौचालयांची अपुरी व्यवस्था असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे मुंबई सेंट्रल, हावडा, सियालदह आणि नवी दिल्ली यांसारख्या देशातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि अव्वल दर्जाच्या स्थानकांवरही बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, कचराकुंड्या आणि इलेक्ट्रॉनिक माहिती फलक यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कॅगने रेल्वे प्रशासनाला पाणीपुरवठा यंत्रणेची नियमित तपासणी करण्याचे, पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची सातत्याने चाचणी घेण्याचे आणि निर्धारित सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, यासाठी स्वच्छता, पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

