ठाणे : नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आणि वर्षभर सोन्याची खरेदी टाळण्याचे केलेले आवाहन सध्या चर्चेचा विषय ठरत असताना, त्यावर विरोधकांकडून तीव्र टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने ठाण्यात बैलगाडी मोर्चा काढत केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदवला. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली गणेशवाडी ते ठाणे महानगरपालिका मुख्यालय असा मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी महापौर शर्मिला पिंपळोळकर यांना निवेदन देत खासगी वाहनांचा वापर कमी करून टीएमटी बससेवेचा वापर करण्याचे आवाहन केले. आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाड घोड्यावरून सहभागी झाले, तर मनोज प्रधान आणि युवक अध्यक्ष अभिजित पवार बैलगाडीतून पालिका मुख्यालयात पोहोचले. “वाह रे मोदी तेरा खेल… महंगा हुआ तेल”, “मोदी फिरतात परदेशी… जनता राहणार उपाशी” यांसारख्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली असून, आगामी काळात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचा आरोप त्यांनी केला. बंगाल निवडणुका संपल्यानंतर इंधन दरवाढ होणार असल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर जनतेला फसवण्याचा आरोप केला. “सरकारने आता घोडे, बैल आणि म्हशी स्वस्तात विकाव्यात आणि जनतेने त्यावर बसून ‘जय मोदी’ म्हणत प्रवास करावा का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत इंधन दरवाढ, महागाई आणि वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याचा आरोप केला. या आंदोलनामुळे ठाणे शहरात काही काळ राजकीय वातावरण तापले होते.

