ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. समुद्रातील मासळीच्या साठ्याचे संवर्धन आणि पावसाळ्यातील वादळी हवामानापासून मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी शासनाने १ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत पावसाळी मासेमारीवर बंदी जाहीर केली आहे. ठाणे-पालघर जिल्ह्याचे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त (तांत्रिक) दिनेश पाटील यांनी यासंदर्भातील माहिती दिली. या दोन महिन्यांच्या कालावधीत समुद्रातील माशांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळे मासेमारी बंदीमुळे माशांच्या बीज निर्मितीला चालना मिळून समुद्रातील मासळीचा साठा वाढण्यास मदत होणार आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या आदेशानुसार, ही बंदी सर्व प्रकारच्या यंत्रचलित आणि यांत्रिक नौकांना लागू राहणार असून पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचलित नौकांना या नियमातून सवलत देण्यात आली आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सध्या समुद्रात गेलेल्या सर्व यांत्रिक नौकांनी ३१ मेपूर्वी बंदरात परतणे बंधनकारक असेल. १ जूननंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरांवर मासे उतरवण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेच, राज्याच्या सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपलीकडे खोल समुद्रात जाणाऱ्या नौकांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागणार आहे. शासनाने सर्व मच्छीमार सहकारी संस्थांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. बंदीच्या काळात एखादी यांत्रिक नौका बेकायदेशीरपणे मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमांतर्गत संबंधित नौका, मासेमारीसाठी वापरलेली साधने आणि पकडलेली मासळी जप्त करण्यात येईल. तसेच संबंधित मालकावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. बंदीच्या काळात समुद्रात जाऊन अपघात झाल्यास शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत किंवा नुकसानभरपाई दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

