ठाणे : कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय परिसरात एका पिसाळलेल्या भटक्या श्वानाने १३० नागरिकांना चावा घेतल्याच्या घटनेनंतर केडीएमसी प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात आणखी एका भटक्या श्वानाने १० ते १२ नोकरदार आणि पादचाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर एका औषध कंपनीच्या प्रतिनिधीलाही श्वानाने चावा घेतल्याची घटना घडली. या सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महापालिकेच्या नियोजनावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. वेळेत भटक्या श्वानांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण केले असते, तर अशी परिस्थिती उद्भवली नसती, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, श्वान निर्बिजीकरण केंद्राच्या कंत्राट प्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित होत असून, निविदा प्रक्रियेत झालेल्या वादामुळे काम रखडल्याची चर्चा आहे. तसेच निर्बिजीकरण केंद्रात पूर्वी गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांचाही पुन्हा उल्लेख होत असून, या प्रकरणात गेल्या वर्षी एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. सोमवारी रेल्वे स्थानक परिसरात तसेच रुक्मिणीबाई रुग्णालयाजवळ झालेल्या हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या नागरिकांवर तातडीने उपचार करण्यात आले. शहाड, आधारवाडी आणि इतर भागांतही भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल आणि महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी कल्याण येथील डॉग सेंटरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी निर्बिजीकरण केंद्रातील सुविधा, लसीकरण प्रक्रिया आणि श्वान पकड मोहिमेची माहिती घेण्यात आली. आयुक्त अभिनव गोयल यांनी नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत निर्बिजीकरण केंद्राची क्षमता वाढविण्याचे निर्देश दिले. दररोज किमान ५० भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण करण्याची क्षमता असलेले नवीन ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात येणार असून, वर्षभरात सुमारे १७ ते १८ हजार श्वानांचे निर्बिजीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी संबंधित एजन्सीला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील संवेदनशील भागांमध्ये विशेष पथके तैनात करून भटक्या श्वानांना पकडण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच सर्व श्वानांचे १०० टक्के निर्बिजीकरण आणि अँटी रेबीज लसीकरण पूर्ण करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि वाहनांचीही व्यवस्था केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, रविवारी संदीप हॉटेल परिसरात १७ नागरिकांना श्वानाने चावा घेतल्याची नोंद असून, रुक्मिणीबाई रुग्णालयात त्या दिवशी श्वानदंश झालेल्या ५८ नागरिकांवर उपचार करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी दिली. प्रशासनाने या घटनांची गंभीर दखल घेत पुढील काळात भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
