ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पांपैकी ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ मार्गिकेबाबत दिलासादायक प्रगती समोर आली आहे. लोकल रेल्वेनंतर मोठ्या प्रमाणात नागरिक मेट्रोला पसंती देत असल्याने या मार्गिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारत असून, मेट्रो ५ ही ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तीन प्रमुख शहरांना जोडणारी महत्त्वाची मार्गिका ठरणार आहे. याशिवाय, या प्रकल्पाचा विस्तार थेट उल्हासनगरपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे हजारो प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि जलद प्रवासाचा लाभ मिळणार आहे. या मार्गिकेची उभारणी तीन टप्प्यांत केली जात आहे. पहिल्या टप्प्यात ठाणे ते धामणकर नाका असा ११.९ किलोमीटरचा मार्ग विकसित केला जात आहे. दुसऱ्या टप्प्यात धामणकर नाका ते दुर्गाडी असा १०.४८ किलोमीटरचा भाग उभारण्यात येणार असून, तिसऱ्या टप्प्यात दुर्गाडी–खडकपाडा–भोईरवाडी–कल्याण मार्गे उल्हासनगरपर्यंत मेट्रो सेवा विस्तारित केली जाणार आहे.
ठाणे ते धामणकर नाका या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, लवकरच या मार्गावर मेट्रोच्या चाचण्या सुरू होण्याची शक्यता असल्याचे संकेत एमएमआरडीएने दिले आहेत. नियोजनानुसार, डिसेंबर २०२६ अखेर हा टप्पा प्रवासी सेवेसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा टप्पा सुरू झाल्यानंतर ठाणे ते भिवंडी दरम्यानचा प्रवास काही मिनिटांत पूर्ण होणार असून, रोजच्या प्रवासात मोठी वेळ वाचेल. या प्रकल्पामुळे हजारो नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना जलद, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार आहे. तसेच रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होऊन वाहतूक कोंडी आणि प्रदूषणातही घट होण्यास मदत होईल. मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर मेट्रो ५ मार्गिका सार्वजनिक वाहतुकीचा महत्त्वाचा आधार ठरणार असल्याचे मानले जात आहे.

