मुंबई : शिंदेसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी राज्याच्या राजकारणात चर्चेला तोंड फोडणारे वक्तव्य केले आहे. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही जिवाचे रान करू, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही मोठे विधान करत त्यांच्या ‘प्रमोशन’ची इच्छा व्यक्त केली. महाराष्ट्राचा आवाज देशभरात पोहोचला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात सर्वोच्च पदावर जावे, अशी आमची अपेक्षा असल्याचे बच्चू कडू म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील महायुतीच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आगामी काळातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर कडू यांच्या विधानाकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.
यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी २०१९ मधील राजकीय घडामोडींचाही उल्लेख केला. त्या काळात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते आणि एकनाथ शिंदे यांनाही मुख्यमंत्रीपदाची इच्छा होती, मात्र त्यावेळी परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही, असे त्यांनी सांगितले. सत्तेत असलो तरी आम्ही सामान्य माणसाचे कार्यकर्ते आहोत, असे सांगत त्यांनी आपल्या राजकीय भूमिकेवरही भाष्य केले. आमच्या हातात शिवसेनेचा झेंडा असला तरी डोक्यातून शेतकरी कधीच जाणार नाही. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठीच आम्ही काम करत राहणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता हातात शिवसेनेचा झेंडा आणि डोक्यात कायम शेतकरी असेल, असे सांगत बच्चू कडू यांनी आपली शेतकरीहिताची भूमिका पुन्हा अधोरेखित केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असून महायुतीतील भविष्यातील नेतृत्वाबाबत चर्चांना वेग आला आहे.

