मुंबई : ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची’ हा मराठी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या लेखन व दिग्दर्शनातून साकारलेल्या आणि वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाने ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. चित्रपटाच्या या उल्लेखनीय यशानंतर कलाकार आणि तंत्रज्ञांच्या टीमने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत ‘देऊळ बंद २’ला महाराष्ट्रभरातून मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. समाजातील विविध घटकांना जोडण्याची आणि त्यांच्या भावनांना स्पर्श करण्याची ताकद या चित्रपटात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील शेतकरी वर्गापासून ते शहरी प्रेक्षकांपर्यंत सर्वांना हा चित्रपट आपलासा वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या भेटीदरम्यान प्रवीण तरडे यांनी प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच चित्रपटाला हे यश मिळाल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांकडून मिळालेली कौतुकाची थाप संपूर्ण टीमचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढवणारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, निर्माते कैलाश वाणी, अभिनेत्री स्नेहल तरडे, अभिनेते रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अतुल कुडले, सुनील पालकर तसेच तंत्रज्ञ आणि चित्रपटाशी संबंधित अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे, या चित्रपटाने अवघ्या १६ दिवसांत ६५ कोटी रुपयांचा व्यवसाय करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे ‘देऊळ बंद २’ हे मराठी चित्रपटसृष्टीतील यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरत आहे.

