नवी दिल्ली : देशभरातील एटीएम सेवांबाबत एक चिंताजनक चित्र समोर आले असून अनेक एटीएममध्ये रोख रकमेचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे. एटीएम उद्योगाशी संबंधित कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री (CATMi) ने यासंदर्भात इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ला पत्र लिहून परिस्थितीची गंभीरता अधोरेखित केली आहे. उद्योग संघटनेच्या माहितीनुसार, मार्च आणि एप्रिल महिन्यांत एटीएममध्ये रोख रक्कम भरण्यासाठी सुमारे ९४ हजार कोटी रुपयांची आवश्यकता होती. मात्र मार्चमध्ये केवळ ६१ हजार कोटी रुपये, तर एप्रिलमध्ये ५४ हजार कोटी रुपयेच उपलब्ध झाले. परिणामी अनेक भागांमध्ये एटीएममध्ये रोख भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये आजही मोठ्या प्रमाणावर रोख व्यवहार होत असल्याने या भागांतील ग्राहकांना अधिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ही बाब रिझर्व्ह बँकेच्या चलन व्यवस्थापन विभागाच्या निदर्शनासही आणून देण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, एटीएम उद्योग आर्थिक आव्हानांनाही सामोरे जात आहे. एका बँकेच्या ग्राहकाने दुसऱ्या बँकेच्या एटीएमचा वापर केल्यास आकारले जाणारे १९ रुपयांचे इंटरचेंज शुल्क वाढत्या खर्चाच्या तुलनेत अपुरे असल्याचा उद्योगाचा दावा आहे. इंधन दरवाढ, वेतनवाढ आणि नवीन नियामक अटींमुळे सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांवरील आर्थिक ताण वाढला आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात देशात सुमारे ४४६.५ दशलक्ष एटीएम व्यवहार झाले, तर गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा ४९८.३ दशलक्ष होता. व्यवहारांच्या एकूण मूल्यातही घट झाली असून ते २.६४ ट्रिलियन रुपयांवरून २.५ ट्रिलियन रुपयांपर्यंत खाली आले आहे. तज्ज्ञांच्या मते, यूपीआय, मोबाईल वॉलेट आणि इतर डिजिटल पेमेंट पद्धतींचा वाढता वापर हे एटीएम व्यवहार कमी होण्यामागील प्रमुख कारण आहे. मात्र रोख व्यवहारांवर अवलंबून असलेल्या नागरिकांसाठी एटीएममध्ये पुरेशी रोख उपलब्धता कायम ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

