मुंबई : महिलांच्या समस्या, तक्रारी आणि अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे जलद निवारण व्हावे, या उद्देशाने महिला व बाल विकास विभागामार्फत दर महिन्याला ‘महिला लोकशाही दिन’ हा उपक्रम राबविला जातो. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा कार्यक्रम नियमितपणे आयोजित केला जात असून, याच अनुषंगाने २० एप्रिल २०२६ रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या दिवशी विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहून महिलांच्या तक्रारींची प्रत्यक्ष दखल घेणार असून, शक्य तितक्या लवकर त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक महिलांनी आपला तक्रार अर्ज निर्धारित नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे. हा अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, ११७ बी.बी.डी. चाळ, पहिला मजला, वरळी, मुंबई – ४०००१८ येथे उपलब्ध आहे. अर्ज वैयक्तिक स्वरूपाचा असणे आवश्यक असून, संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रांसह तो सादर करणे बंधनकारक आहे. न्यायालयीन प्रक्रियेत असलेली प्रकरणे, अपूर्ण कागदपत्रे असलेले अर्ज, सेवा-संबंधित किंवा संस्थात्मक तक्रारी तसेच वैयक्तिक नसलेल्या बाबी या उपक्रमात स्वीकारल्या जाणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन देणे आणि शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून त्वरित न्याय मिळवून देणे या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरत असून, पात्र महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.

