मुंबई : राज्य सरकारने रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला असून, एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी एप्रिल महिन्यात वितरित करण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे लाभार्थ्यांना पुढील दोन महिने रेशन दुकानांवर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. वारंवार दुकानांवर जावे लागणाऱ्या नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी हा उपाय करण्यात आला असून, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना याचा मोठा फायदा होणार आहे. राज्यातील ग्रामीण तसेच दुर्गम भागातील नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेतून दिलासा मिळावा, यासाठी शासनाने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कमी वेळा घराबाहेर पडावे लागावे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.
या योजनेनुसार प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती दरमहा ५ किलो धान्य मिळते, त्यामुळे तीन महिन्यांसाठी एकूण १५ किलो धान्य एकाच वेळी दिले जाणार आहे. तसेच अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत येणाऱ्या कुटुंबांना दरमहा ३५ किलो धान्य मिळते, ज्यामुळे तीन महिन्यांसाठी एकूण १०५ किलो धान्य प्रति कुटुंब वितरित केले जाईल. या धान्यात तांदूळ आणि गहू यांचा समावेश असणार आहे. या निर्णयाचा लाभ अंत्योदय अन्न योजना तसेच प्राधान्य गटातील सर्व पात्र रेशनकार्डधारकांना मिळणार आहे. वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी बंधनकारक करण्यात आली असून, पात्र लाभार्थ्यांनी वेळेत आपले धान्य उचलावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

