नाशिक : प्रजासत्ताक दिनाचा देशभरात उत्साह दिसून येत असतानाच नाशिकमध्ये वेगळीच घटना घडली. नाशिकच्या पोलीस कवायत मैदान येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरू असताना मंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजवंदन केले, उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी मंत्री महाजन यांनी आपल्या भाषणात संविधानाशी संबंध नसलेल्यांचं नाव घेतल्याचा आक्षेप वन अधिकारी माधवी जाधव यांनी घेतला. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही, असा सवाल उपस्थित केला. वन विभागाच्या अधिकारी माधवी जाधव यांनी कार्यक्रमास्थळी घातलेल्या गोंधळानंतर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होत. माधवी जाधव यांच्या सहकाऱ्यांनी समजूत काढत कार्यक्रमाच्या ठिकाणाहून त्यांना बाजूला नेलं. “मंत्री महोदयांनी बाबासाहेबांचे नाव घेतलं नाही. संविधान घडविलं त्यांनाच संपवायला निघालेत”, असा आरोप या महिला अधिकाऱ्यानं केल्यानं काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
वन अधिकारी माधवी जाधव म्हणाल्या, “जो संविधानाला कारणीभूत आहे, त्यालाच तुम्ही संपवायला निघाला आहात. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे. मी माफी मागणार नाही. पालकमंत्र्यांची त्यांची चूक पदरात घ्यावी”. संतापलेल्या अधिकाऱ्यांना महिला पोलिसांनी समजाविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी म्हटलं, “मला मीडियाशी देणे-घेणे नाही. वाळू गाड्या उचलीन. मातीकाम करेन. पण, बाळासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला सस्पेंड करायचे असेल तर करू शकता. बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही. मी २६ जानेवारी मानत नाही. पण, लोकशाही आहे. मॅडम, तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्रीसुद्धा संविधानामुळे आहेत. कोणता जातीभेद केलेला नाही. समानता केलेली आहे. लोकशाहीला कारणीभूत नसलेल्यांची नावे घेतलेली आहेत. पण, प्रजासत्ताकदिनाचा मानकरी आहे, त्यांच नाव घेण्यात आलं नाही”.वन अधिकारी माधवी जाधव यांनी आक्षेप घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब यांचं नाव घेणं अनवधानानं राहिलं असेल, असे म्हटलं आहे. ” माझा तसा कुठलाही हेतू नव्हता. त्यात मी फक्त भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, अशा घोषण्या दिल्या. माझं नाव डावलण्याचा कुठलाही हेतू नाही. मी दिलगिरी व्यक्त करतो”, असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. डॉक्टर बाबासाहेबांचं नाव न घेणं ही पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे . त्यांनी चूक मान्य करावी. मला सस्पेंड केलं तरी चालेल. वाळूच्या गाड्या उचलेल. माती काम करेल. पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. बाबासाहेबांना संपायचं काम करायचं नाही-वन अधिकारी, माधवी जाधव

