ठाणे : बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी या बदलत असतात सध्या कृत्रीम बुद्धिमत्ताचे युग आले असून याचा पुरेपूर वापर सर्व क्षेत्रात होताना पाहायला मिळत आहे. यंदाच्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीतही काही इच्छूक उमेदवारांकडून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणूका असो वा विधानसभा किंवा लोकसभा निवडणूका उमेदवारांकडून अनेक ठिकाणी पारंपारिक पद्धतीचे निवडणूक प्रचार म्हणजेच ढोल ताशा वाजवणे, बॅनर – पोस्टर धरून दारोदारी मतांचा जोगवा मागत फिरणे. त्यासह मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे असाच प्रचार होताना आतापर्यंत पाहिले आहे. परंतू, गेले काही वर्षात समाजमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम रील यामार्फत मोठी प्रसिद्धी मिळत आहे.
यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत देखील समाजमाध्यमांचा प्रचारासाठी वापर झालेला पाहायला मिळाले. परंतू, आता या जोडीला कृत्रीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सर्वाच क्षेत्रात मोठ्याप्रमाणात केला जात आहे. विशेष करुन तरुण पिढी या तंत्रज्ञानाविषयी अधिक सजग झाली आहे. यंदा महापालिका निवडणूकीत अनेक नविन चेहरे निवडणूकीच्या रिंगणात उतरु पाहत आहेत. त्यांनी इच्छूक उमेदवार म्हणून तयारीला सुरुवात देखील केली आहे. या तरुणांकडून पारंपारिक प्रचार सोडून नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. पूर्वी निवडणुकीचे पोस्टर बॅनर व्हिडिओ बनवण्याकरिता तासनतास वेळ वाया जात असे, ते नागरिकांपर्यंत पोहोचविणे याकरिता खर्चही मोठ्या प्रमाणात व्हायचा, मात्र एआय च्या मदतीने आता क्षणात पोस्टर तसेच आपल्याला हवे त्या प्रकारचे व्हिडिओ सुंदर अशा व्हॉइस रेकॉर्डिंग मध्ये क्षणात तयार झालेले पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे असलेल्या प्रभागात तो संपूर्णपणे नागरिकांपर्यंत पोहोचविता येतो.

