ठाणे : सामान्य नागरिकांना सरकारी सेवा त्यांच्या दारात सहज, सुलभ आणि जलदगतीने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने काही महिन्यांपूर्वी ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’(Door Step Delivery) हा अभिनव उपक्रम सुरु केला. या उपक्रमाला ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत साडेतीन हजाराहून अधिक नागरिकांना घरपोच दाखले देण्यात जिल्हापरिषदेला यश आले आहे.
‘डोअर स्टेप डिलिव्हरी’(Door Step Delivery) या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांना घरबसल्या शासनाच्या विविध सेवा मिळत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम लोकाभिमुख आणि परिणामकारक ठरत आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या दारी सेवा उपलब्ध करून देणे, हेच खऱ्या अर्थाने सुशासनाचे प्रतीक आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही प्रशासन आणि जनतेतील अंतर कमी करत आहोत. हा उपक्रम प्रत्येक गावात, प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा जिल्हा परिषदेचा संकल्प आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांना घरबसल्या ४०२ प्रकारच्या शासकीय सेवा मिळत आहेत. प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ४ हजार १३ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ३ हजार ६५९ नागरिकांना घरपोच सेवा देण्यात आली आहे. उर्वरित १७० अर्जांवर काम सुरू असल्याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे यांनी दिली.

