मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बससेवेत आता प्रवाशांचे स्वागत अधिक सन्मानपूर्वक पद्धतीने होणार आहे. १ मे २०२६ पासून ‘आपली बस, आपली सेवा’ हा विशेष उपक्रम राज्यभरातील मध्यम व लांब पल्ल्याच्या बसमध्ये कायमस्वरूपी राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत बसमध्ये चढताना प्रवाशांना ‘जय महाराष्ट्र’ म्हणत अभिवादन केले जाणार असून, वाहक स्वतःची आणि चालकाची ओळख करून देणार आहेत. या उपक्रमामुळे प्रवाशांना अधिक आदरयुक्त, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळेल, असा विश्वास एसटी प्रशासनाने व्यक्त केला आहे. वाढत्या स्पर्धेत खासगी प्रवास सेवांना टक्कर देण्यासाठी एसटीने हा सकारात्मक बदल स्वीकारला असून, प्रवासी अनुभव अधिक समाधानकारक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अभियानांतर्गत चालक आणि वाहकांच्या कामकाजात अधिक शिस्त आणि जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. बस सुरू करण्यापूर्वी स्वच्छतेची तपासणी अनिवार्य करण्यात आली असून, बस सुटण्याच्या किमान १५ मिनिटे आधी फलाटावर उभी करणे बंधनकारक आहे. तसेच दोन्ही कर्मचाऱ्यांनी वेळेत आणि गणवेशात उपस्थित राहणे आवश्यक असेल. प्रवाशांना प्रवासाचा मार्ग, थांबे, वेळापत्रक आणि उपलब्ध आसनांची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. आरक्षित प्रवासी वेळेत न आल्यास त्यांच्याशी संपर्क साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याशिवाय, प्रवासादरम्यान मदतीसाठी वाहकांशी संपर्क साधण्याचे आवाहन, मौल्यवान वस्तू स्वतःजवळ सुरक्षित ठेवण्याची सूचना आणि मोठे सामान डिक्कीत ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रवासी संख्या वाढविणे, तक्रारी कमी करणे आणि उत्पन्नात वाढ करणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, बसमध्ये स्वच्छता राखण्यासाठी प्रवाशांचेही सहकार्य अपेक्षित आहे.

