ठाणे : १४७ कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल मतदार पुनरिक्षण मोहिमेला वेग आला असून, मतदार नोंदणी आणि जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाने घरोघरी पोहोचण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदारांना प्रत्यक्ष भेट देऊन Enumeration Form (गणना अर्ज) वाटप करण्यात आले. प्रशासकीय यंत्रणा थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचल्याने या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी मतदार नोंदणी अधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी पुरुषोत्तम थोरात, माजी नगरसेविका नम्रता भोसले-जाधव, निवडणूक नायब तहसीलदार संजय साळुंके, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उमेश खेडकर, महसूल सहाय्यक बापू पारेकर यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमादरम्यान मतदार यादीतील निवडक मतदारांना प्रातिनिधिक स्वरूपात गणना अर्ज सुपूर्द करण्यात आले. या माध्यमातून नागरिकांना मतदार यादी अद्ययावत ठेवण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले तसेच नोंदणी प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.
विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेचा मुख्य उद्देश मतदार यादीतील त्रुटी दूर करून ती अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक बनविणे हा आहे. या प्रक्रियेत नव्याने वास्तव्यास आलेल्या पात्र नागरिकांची नोंद करणे, स्थलांतरित किंवा दुबार नावांची छाननी करणे तसेच नवमतदारांची नोंदणी करणे यावर भर दिला जात आहे. लोकशाही प्रक्रियेला अधिक सक्षम आणि विश्वासार्ह बनविण्यासाठी अद्ययावत मतदार यादी महत्त्वाची असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. एकही पात्र नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी निवडणूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी भेट देऊन माहिती संकलित करत आहेत. नागरिकांनी आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती अचूकपणे द्यावी आणि गणना अर्ज वेळेत भरून जमा करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदार यादीत समावेश होणे आवश्यक असून, या विशेष पुनरिक्षण मोहिमेला सर्वांनी सक्रिय सहकार्य करावे, असेही प्रशासनाच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.
