वसई : वसईच्या पूर्व पश्चिम अशा भागात मतदानाला निरुत्साह दिसून येत असला तरी वसई तालुक्याच्या किनार पट्टीच्या भागात राहणाऱ्या कोळी बांधवांमध्ये मतदानासाठीचा उत्साह पहायला मिळाला. मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव व महिला घराबाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
वसई पश्चिमेचा परिसर हा निसर्गरम्य परिसर आहे. या भागातील किनारपट्टीच्या भागात वसई, नायगाव, पाचूबंदर, किल्ला बंदर असे कोळीवाडे असून या भागातील मोठ्या संख्येने नागरिक मासेमारीचा व्यवसाय करतात.गुरुवारी वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.यावेळी मासळी विक्री व अन्य कामे बाजूला ठेवत मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. यात विशेषतः महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक, युवा वर्ग यांचा उत्साह पहायला मिळाला. पाचूबंदर येथे फुलर्स आंतोन चांदी ७३ वर्षे व शायलिन आंतोन चांदी या सत्तर वर्षीय कोळी महिलांनी मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. कामं ही रोजच असतात मतदान हे पाच वर्षातून एकदा येते. त्याचा हक्क बजावणे हा आमचा अधिकार आहे. म्हणून आम्ही सर्व महिला येथे आधी मतदान करण्यास आले असल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिली.

