नवी दिल्ली : विमान प्रवास… अनेकांसाठी हा मुद्दा प्रचंड कुतूहलाचा असला तरीही या विमानतळावर पोहोचल्यानंतर आजही सर्वसामान्य प्रवासी मात्र काही गोष्टी प्रकर्षानं टाळतात. इथं त्यांचा नवखेपणा कारणीभूत नसून कारण असते ते म्हणजे आर्थिक नियोजनाचं. विमानतळावर पोहोचलं असता तिथं भूक लागली की, काही मंडळी ती भूकही आवरतात. कारण, बाहेर २० रुपयांना मिळणाऱ्या एखाद्या पदार्थासाठी विमानतळावर थेट २०० ते २५० रुपये मोजावे लागतात. इतर पदार्थांचे दरही त्याच पटीनं वाढतात. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारकडून आता देशातील सर्व विमानतळांवर प्रवाशांना परवडणाऱ्या, त्याहूनही स्वस्त दरात चहा आणि समोसा यासह इतरही खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचा बेत आखला जात आहे.
केंद्रानं आखलेल्या या बेतानुसार २०२६ या वर्षअखेरीपर्यंत भारतातील जवळपास सर्व विमानतळांवर ‘उडान यात्रा कॅफे’ सुरू करण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर देशातील काही विमानतळांवर ही सुविधा सुरू करण्यात आली असून यामध्ये कोलकाता, पुणे, अहमदाबाद, विजयवाडा, भुवनेश्वर आणि चेन्नईचा यामध्ये समावेश आहे. देशातील अनेक अशी विमानतळं आहेत जिथं मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचे दर सामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. किंबहुना काही ठिकाणी तर एक कप चहासाठी २०० ते ३०० रुपयेसुद्धा मोजावे लागतात. या वस्तुस्थितीविरोधात सातत्यानं सूर आळवला जात असल्याचं पाहून केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयानं ‘उडान यात्रा कॅफे’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘उडान यात्रा कॅफे’ या योजनेअंतर्गत मागील वर्षी कोलकाता विमानतळावर शुभारंभ करण्यात आला जिथं विमानतळावरच प्रवाशांना १० रुपयांना चहा, २० रुपयांमध्ये कॉफीस १० रुपयांमध्ये पाण्याची बाटली, २० रुपयांमध्ये समोसा आणि २० रुपयांमध्ये रसगुल्ला उपलब्ध करून देण्यात आला.

