वृत्तसंस्था : भारतीय चित्रपटसृष्टीतील अजरामर चित्रपट ‘बॉर्डर’च्या सिक्वेलची म्हणजेच ‘बॉर्डर २’ ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच या चित्रपटातील पहिले गाणे ‘घर कब आओगे’ प्रदर्शित झाले असून या गाण्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. हे गाणे १९९७ मधील ‘संदेशे आते है’ या गाण्याचे नवे व्हर्जन असून याने पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. या नवीन गाण्याचे संगीत दिग्दर्शन मिथुन याने केले असून मनोज मुंतशीर यांनी मूळ गीताला जोड दिली आहे. विशेष म्हणजे या गाण्यात सोनू निगम, अरिजित सिंग, रूपकुमार राठोड, विशाल मिश्रा आणि दिलजीत दोसांझ यांसारख्या दिग्गज गायकांचा आवाज ऐकायला मिळत आहे. सोनू निगम आणि रूपकुमार राठोड यांच्या आवाजामुळे या गाण्याचा आत्मा कायम राहिला असल्याची भावना चाहते व्यक्त करत आहेत.
गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. एका युजरने लिहिले की, “याला म्हणतात योग्य रिमेक! सोनू निगमचा आवाज आजही जादू करतो.” तर दुसऱ्या एका चाहत्याने दिलजीत दोसांझ आणि विशाल मिश्रा यांच्या भागाचे कौतुक केले आहे. काही लोकांना मात्र मूळ गाण्याची सर या गाण्याला नसल्याचे वाटत आहे. अरिजित सिंगच्या आवाजाबाबतही चाहत्यांमध्ये संमिश्र चर्चा असून अनेकांनी “जुन्या दिवसांची आठवण झाली” असे म्हटले आहे. मूळ गाण्याचे गीत जावेद अख्तर यांनी लिहिले होते, ज्यासाठी त्यांना १९९८ मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘बॉर्डर २’ मध्ये सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनुराग सिंग यांनी दिग्दर्शित केलेला ‘बॉर्डर २’ हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

