मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, एकूण २८६९ नगरसेवकपदांसाठी आता १५९३१ उमेदवार नशीब आजमावत आहेत. मुंबईत सर्वाधिक उमेदवार असून, नव्याने महापालिका झालेल्या इचलकरंजी आणि जालन्यात पहिल्यांदाच ऐतिहासिक मतदान होणार आहे. राज्याची राजधानी मुंबईत २२७ जागांसाठी सर्वाधिक १७०० उमेदवार रिंगणात आहेत. त्यापाठोपाठ पुणे शहरात १६५ जागांसाठी ११६६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे पुण्यात तब्बल ९६८ उमेदवारांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने तेथे मोठी खळबळ उडाली होती. उपराजधानी नागपुरात १५१ जागांसाठी ९९३ उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पुण्यात निवडणूक प्रक्रियेत सुरुवातीला ३३४२७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील २४७७१ अर्ज वैध ठरले, तर ८८४० उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. माघार घेण्यामध्ये पुणे (९६८) अग्रस्थानी असून, त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगर (५५२) आणि मुंबई (४५३) यांचा क्रमांक लागतो. सर्वात कमी उमेदवार (२३०) इचलकरंजी महापालिकेत आहेत.

