मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘गांधार फाऊंडेशनच्या मोफत डायलिसिस सेंटर’चे उदघाटन केले.
या सेवाभावी डायलिसिस सेंटरमार्फत दररोज 30 गरजू रुग्णांना मोफत डायलिसिसची सुविधा मिळणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, समाजात किडनीच्या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. डायलिसिसचा खर्च अनेक सामान्य व निम्नमध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारा नसतो. त्यामुळे अशा संस्था पुढे येऊन गरजूंना मोफत सेवा देत असल्याचे पाहणे समाधानकारक आहे. व्यक्ती आपल्या कर्तृत्वातून संपत्ती कमावते, परंतु गरजूंच्या आशीर्वादांपेक्षा मोठी संपत्ती दुसरी नाही. पारेख परिवार आणि गांधार फाऊंडेशन अशा उपक्रमांद्वारे जनसेवेचा वसा समर्थपणे पुढे नेत आहे.
ते पुढे म्हणाले की, भारतीय विचारसरणीनुसार समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे आणि समाजातील सक्षम लोकांनी त्यासाठी पायाभूत सेवा द्याव्यात, हा आपला दृष्टिकोन आहे. सरकारदेखील महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे ₹5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार देत असून, धर्मादाय रुग्णालये व चांगल्या संस्थांनाही त्यात सामावून घेतले आहे. मुख्यमंत्री कक्षामार्फत अनेक गरजूंना मोफत उपचार दिले जातात, यात 30-40 लाखांपर्यंतच्या शस्त्रक्रियांचाही समावेश आहे. या सेवाभावी कार्यात गांधार फाऊंडेशनचा मोलाचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी आमदार प्रवीण दरेकर, आमदार योगेश सागर, आमदार विद्या ठाकुर, आमदार अतुल भातखळकर, गांधार ग्रूप ऑफ कंपनीचे चेअरमन रमेश पारेख आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

