मुंबई : प्रत्येकाचे स्वतः चे घर असावे असे स्वप्न असते. परंतु सध्या महागाई एवढी वाढत आहे की घर खरेदी करणे हे सर्वसामान्य नागरिकांच्या बजेटबाहेर गेले आहे. त्यामुळे घर खरेदी करण्याचा अनेकजण विचारदेखील करत नाहीत. परंतु आता तुमच्याकडे घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. म्हाडाने तब्बल ५ हजारांपेक्षा जास्त घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. कोकण गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर आणि जिल्हा येथील घरांसाठी ही सोडत जाहीर केली आहे. याचसोबत वसई (जिल्हा पालघर) येथील घरांसाठीही सोडत जाहीर केली आहे.
याअंतर्गत ओरोस, कुळगाव-बदलापुर येथील ७७ भूखंडदेखील विक्रीसाठी आहेत. एकूण ५२८५ सदनिकांसाठी आणि ७७ भूखंडासाठी ही सोडत जाहीर केली आहे. या सोडतीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे जर हक्काचे घर घ्यायचे असेल तर ही उत्तम संधी आहे. म्हाडाच्या या सोडतीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या सदनिकांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑगस्ट २०२५ आहे. तर रक्कम भरण्याच तारीख १४ ऑगस्ट २०२५ आहे. या सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची यादी २१ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाईल. यानंतर तुम्हाला २५ ऑगस्ट रोजी प्रारुप यादीवर दावे किंवा हरकती नोंदवता येणार आहे. १ सप्टेंबरला सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी जाहीर केली जाईल. यानंतर ३ सप्टेंबर रोजी सोडत जाहीर केली जाईल. ही सोडत ऑनलाइन पद्धतीने जाहीर करणार असून ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे केली जाणार आहे. म्हाडाने अर्जप्रक्रियेबाबत माहिती दिली आहे. ही लॉटरी प्रक्रिया पूर्णपण ऑनलाइन असणार आहे. त्यामुळे कोणत्याही एजंट किंवा दलालावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला IHLMS 2.0 या प्रणालीवरुन किंवा अॅपद्वारे अर्ज करता येणार आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

