ठाणे : मुंबई उपनगरी रेल्वे मार्गांवरील अपघात आणि मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी एमआरव्हीसीने आता पादचारी पुलांऐवजी भुयारी मार्गांवर भर देण्यास सुरुवात केली आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच पूर्णपणे जलरोधक ‘ऑल वेदर सबवे’ भिवंडी येथे उभारण्यात येत असून त्यासाठी अत्याधुनिक त्रिस्तरीय जलरोधक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास मुंबईतील रेल्वे रुळ ओलांडण्याच्या धोकादायक आणि अपघातप्रवण ठिकाणी अशाच प्रकारचे सबवे उभारण्याचा विचार आहे. रेल्वे प्रशासनाने यापूर्वी महामुंबईतील ३६ संवेदनशील ठिकाणी पादचारी पूल उभारले असले तरी त्यांची उंची अधिक असल्याने अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून थेट रुळ ओलांडण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय म्हणून सबवेची संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. पनवेल-वसई मार्गावरील भिवंडी स्थानकात उभारला जाणारा हा ६८ मीटर लांबीचा भुयारी मार्ग सात रेल्वे मार्गिकांच्या खाली पूर्व-पश्चिम जोडणी साधणार आहे.
या सबवेच्या बांधकामासाठी ‘बॉक्स पुशिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून रेल्वे वाहतूक सुरू असतानाही काम सुरक्षितपणे पार पाडले जाणार आहे. रुळांखाली मजबूत लोखंडी गर्डर बसवून संरचनेची सुरक्षितता सुनिश्चित केली जात आहे. ‘कप अँड कोन’ प्रणालीद्वारे भूमिगत संरचना जोडली जाणार असून बॉक्सच्या सांध्यांमध्ये रबर गॅस्केट बसवून पाणी झिरपण्यास प्रतिबंध केला जाणार आहे. पावसाळ्यात सबवेमध्ये पाणी साचण्याच्या समस्या टाळण्यासाठी विशेष जलरोधक मिश्रण आणि अतिरिक्त संरक्षणात्मक थर वापरण्यात येणार आहेत. तसेच पावसाचे पाणी आत शिरू नये म्हणून प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याच्या मार्गाची पातळी ६० सेंटीमीटरने उंच ठेवण्यात येणार आहे. सन २०२२ ते २०२५ या कालावधीत मध्य रेल्वेवर ६,२२५ आणि पश्चिम रेल्वेवर ३,६२७ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे रेल्वे रुळ ओलांडणी रोखण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात असून भविष्यात ‘एमयूटीपी-४’ अंतर्गत अशा आणखी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

