ठाणे : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव का लागले पाहिजे याविषयी ठाणे शहरातील विविध गावठाण, कोळीवाडे येथील प्रत्येक ठाणेकर भूमिपुत्रांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी कोळी समाजाने नवरात्रौत्सवात ठाणे शहरात दिबा जागर यात्रा सुरु केली आहे. नवरात्रौत्सव मंडळात ही दिबा जागर यात्रा राबविली जात आहे. दिबा जागर यात्रेचा उद्देश, दिबा पाटील यांच्या सामाजिक राजकीय कार्याची महती सांगितली जाते. नुकतीच ही दिबा जागर यात्रा चेंदणी कोळीवाडा, वाघबीळ येथे पार पडली. कोपरी, बाळकुम, कासारवडवली, कोळीवाडा, मोघरपाडा, ओवळा, भाईंदरपाडा, कळवा, ढोकाळी याठिकाणी दिबा जागर यात्रा आयोजित केली जाणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या विशेष चर्चेत आहे. या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे यासाठी आगरी-कोळी भूमीपुत्र समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. मध्यंतरी शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी एक बाईक रॅली काढत या समाजातील भावनांना वाट करुन दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव मिळण्यासाठी मागचे पाच ते सहा वर्षे आंदोलन सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी या विमानतळाच्या उद्घाटन ३० सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल असे जाहीर करण्यात आले होते. परंतू, त्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी ३० सप्टेंबरला विमानतळाचे उद्घाटन होणार नाही अशी माहिती माध्यमांना दिली. परंतू, अद्याप विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव दिले जाईल याबाबत कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही.