मुंबई : बीडीडी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सर्वप्रथम ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांनी प्रकल्पाला पाठिंबा देत घरे रिकामी केली होती. मात्र पुनर्विकासाचे काम संथगतीने सुरू असल्याने हे रहिवासी गेली सात वर्षे संक्रमण शिबिरात राहत होते. आता त्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून म्हाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या दोन पुनर्वसित इमारतींना निवासी दाखला मिळाल्यानंतर ३४२ घरांचा ताबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रहिवाशांना नव्या घरांच्या चाव्या वितरित केल्या जाणार असून त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने सुरू असून पूर्ण झालेल्या इमारतींचा ताबा संबंधित रहिवाशांना दिला जात आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये वरळीतील ५५६ रहिवाशांना घरे देण्यात आली होती. त्यानंतर आणखी ८२७ घरांचा ताबा देण्यात आला असून ५७४ घरांचे वाटप सुरू आहे. नायगावमध्येही मार्च २०२६ मध्ये ८६४ आणि जून २०२६ मध्ये आणखी ५३७ घरांचा ताबा रहिवाशांना देण्यात आला. ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात सात इमारतींमध्ये एकूण १,२४१ घरांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी दोन इमारतींचे काम पूर्ण होऊन त्यांना निवासी दाखला मिळाला असून ३४२ घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाला वेग देण्यासाठी रहिवासी आणि पुनर्विकास समितीने सातत्याने पाठपुरावा केला होता. रहिवासी कमलाकर नडगावकर यांनी अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या हक्काच्या घराचे स्वप्न आता पूर्ण होत असल्याची भावना व्यक्त केली, तर समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी उर्वरित पाच इमारतींचे कामही वेगाने पूर्ण करून सर्व रहिवाशांना लवकरात लवकर नव्या घरात स्थलांतरित करण्याची मागणी केली. म्हाडाच्या नियोजनानुसार उर्वरित पाच इमारतींचे काम पुढील दीड ते दोन महिन्यांत पूर्ण करून त्यांचाही ताबा देण्याचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, बीडीडी चाळीतील १५ हजारांहून अधिक रहिवाशांचे पुनर्वसन असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य म्हाडाने निश्चित केले असून तिन्ही पुनर्विकास प्रकल्पांच्या कामांना आता अधिक वेग देण्यात आला आहे.
