मुंबई : पावसाळ्यात दूषित पाणी, चिखल आणि अस्वच्छ परिसरामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोएन्टेरिटिस आणि कावीळ यांसारख्या आजारांबरोबरच लेप्टोस्पायरोसिस या गंभीर जीवाणूजन्य संसर्गाकडेही दुर्लक्ष करू नये, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसानंतर मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांत या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. साचलेले पाणी, बांधकामस्थळांवरील निष्काळजीपणा, दूषित पिण्याचे पाणी आणि अस्वच्छ परिसर यामुळे संसर्गाचा धोका वाढत आहे. लेप्टोस्पायरोसिस हा लेप्टोस्पायरा या जीवाणूमुळे होणारा झुनोटिक आजार असून तो प्रामुख्याने उंदीर आणि इतर कुरतडणाऱ्या प्राण्यांच्या लघवीद्वारे पसरतो. हे जीवाणू दूषित पाणी, चिखल किंवा ओलसर मातीत काही काळ जिवंत राहू शकतात. अशा पाण्यातून अनवाणी चालताना त्वचेवरील लहान जखमा, भेगा किंवा ओरखड्यांमधून हा संसर्ग शरीरात प्रवेश करतो. शेती कामगार, स्वच्छता कर्मचारी, महापालिकेचे कर्मचारी, मच्छिमार तसेच पूरग्रस्त भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना या आजाराचा धोका अधिक असतो. सुरुवातीला ताप, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, उलट्या, जुलाब आणि त्वचेवर पुरळ अशी लक्षणे दिसतात. मात्र वेळेवर उपचार न मिळाल्यास यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे आणि मेंदू यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम होऊन रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, पावसाचे किंवा सांडपाण्याचे दूषित पाणी आणि काही वेळा दूषित पिण्याचे पाणीही संसर्गाचे कारण ठरू शकते.
आरोग्य विभागाने नागरिकांना पावसाळ्यात विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पूर किंवा दूषित पाण्याच्या संपर्कानंतर ताप, थंडी, खोकला, स्नायू दुखणे, कावीळ किंवा अतिसार यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात तपासणी करून उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. लेप्टोस्पायरोसिसवर डॉक्सिसायक्लीन, अझिथ्रोमायसिन आणि सेफट्रीएक्सन यांसारख्या प्रतिजैविकांद्वारे प्रभावी उपचार उपलब्ध असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही औषधे तोंडावाटे किंवा शिरेद्वारे दिली जातात. मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये लेप्टोस्पायरोसिसचे १३६ रुग्ण नोंदवले गेले होते, तर २०२६ मध्ये ही संख्या वाढून १५७ वर पोहोचली आहे. संसर्ग रोखण्यासाठी दूषित पाण्याच्या संपर्कात आलेल्या ९० हजार ७२८ नागरिकांना प्रतिबंधात्मक औषधे देण्यात आली आहेत. याशिवाय मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग आणि कीटकनाशक नियंत्रण विभाग समन्वयाने काम करत असून बांधकामस्थळे, झोपडपट्ट्या आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांची नियमित तपासणी, दूषित पाणीपुरवठा टाळण्यासाठी जलनमुने तपासणे, तापाच्या रुग्णांचे सक्रिय सर्वेक्षण, त्वरित निदान, जनजागृती मोहीम आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन अशा उपाययोजना राबविल्या जात आहेत. आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना साचलेल्या पाण्यात अनवाणी न चालणे, स्वच्छ पिण्याचे पाणी वापरणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे आणि कोणतीही लक्षणे दिसताच विलंब न करता वैद्यकीय सल्ला घेणे, असे आवाहन केले आहे.

