मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. शुक्रवारी पहाटेपासून अनेक भागात संततधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शहर आणि उपनगरांत शुक्रवारी पहाटेपासून संततधार पाऊस कोसळत आहे. शहरातील परळ, कुलाबा, वरळी भागात पावसाचा जोर वाढला आहे. उपनगरातील वांद्रे, अंधेरी परिसरात देखील पाऊस कोसळत आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुढील दोन – तीन दिवस पाऊस सक्रिय राहील, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने शहर आणि उपनगरांत मागील दोन – तीन दिवसांपासून हजेरी लावली आहे.
पावसाळी वातावरण, ढगाळ हवामानामुळे मुंबईतील उकाडा काहीसा कमी झाला आहे. याचबरोबर पाऊसही संततधार कोसळत आहे. यामुळे जुलै महिन्याची सरासरी पाऊस गाठेल अशी आशा पल्लवित झाली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे पाऊस सरासरी गाठेल की नाही याबद्दल शंका होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे सरासरी गाठता येईल. हवामान विभागाने कोकणातील रायगड, रत्नागिरी, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत आज अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. याचबरोबर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर, वर्धा, नागपूर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर पालघर, नाशिक घाट परिसर, सातारा, कोल्हापूर, अमरावती, हिंगोली, नांदेड, या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच वाशिम, अकोला, यवतमाळ, परभणी, बुलढाणा या भागात विजांसह पावसाची शक्यता आहे.

