ठाणे : राज्य शासनाने अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांसाठी आणखी एक दिलासादायक निर्णय घेत, पात्र कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याची योजना सुरू केली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या ‘कॅप्टीव्ह मार्केट’ उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव मस्केपाटील यांनी संबंधित यंत्रणांना यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. या मोहिमेमुळे अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांतील एकूण ४८ हजार ७०४ अंत्योदय कुटुंबांना थेट लाभ मिळणार असून, मोफत धान्य योजनांबरोबरच हा एक अतिरिक्त दिलासा ठरणार आहे. साड्यांसोबत कापडी पिशव्यांचाही समावेश करण्यात आला असून, स्थानिक स्तरावर वितरणाची संपूर्ण यंत्रणा उभी करण्यात आली आहे.
या योजनेची अंमलबजावणी सुरळीत आणि पारदर्शक राहावी यासाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाची ‘नोडल एजन्सी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळाकडून तालुकास्तरीय गोदामांपर्यंत साड्यांचा पुरवठा सुरू असून, त्यानंतर रास्त भाव दुकानांमार्फत लाभार्थ्यांपर्यंत वितरण केले जाणार आहे. प्रत्येक साडी वितरणाची नोंद ‘ई-पॉस’ मशीनद्वारे ऑनलाइन एई-पीडीएस पोर्टलवर करण्यात येणार असल्याने गैरव्यवहाराला आळा बसणार आहे. साठवणुकीदरम्यान साड्यांचे नुकसान होऊ नये म्हणून गोदामांमध्ये विशेष खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ‘रूट ऑप्टिमायझेशन’ प्रणालीच्या मदतीने वाहतुकीचे नियोजन करून वेळेत पुरवठा सुनिश्चित केला जात आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यात सर्वाधिक १८ हजार २६८ साड्यांचे वाटप होणार असून, मुरबाडमध्ये ११ हजार २२१, भिवंडीत ११ हजार ४७४, अंबरनाथमध्ये ४ हजार ८४ आणि कल्याणमध्ये २ हजार ८८१ साड्या वितरित केल्या जातील. याशिवाय एफसीआय भिवंडीकरिता ७७६ साड्यांची तरतूद करण्यात आली असून, कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन केले जात आहे.

