पुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांच्या विरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच वाहनांवरील थकीत दंडाची रक्कम ३० दिवसांच्या आत जमा न केल्यास, वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) पाठवला जाणार आहे, अशा इशारा पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने दिला आहे.
त्यामुळे नागरिकांनी वाहनावरील थकीत दंडाची रक्कम चौकात वाहतूक नियमनासाठी थांबलेल्या पोलिस अंमलदारांकडे जमा करावी, असेही आवाहन पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करूनही दंड न भरलेल्या वाहनमालकांना अधिकृत नोटीस पाठवण्यात येत आहे. त्यानुसार संबंधितांनी ३० दिवसांच्या आत दंड भरणे आवश्यक असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. दंड न भरल्यास वाहन चालकाचा वाहन परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जाणार आहे. तसेच प्रकरण न्यायालयात दाखल करण्याचीही कारवाई केली जाईल. त्यामुळे वाहनधारकांनी थकीत दंडाकडे दुर्लक्ष न करता तत्काळ दंड भरावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

