मुंबई : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, विविध देशांतील पर्यटकांसह महाराष्ट्रातील अनेक नागरिक आणि पर्यटकही तेथे अडकले आहेत. सततच्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका रसुवा परिसराला बसला असून, अनेक भागांतील रस्ते, पूल आणि दळणवळण व्यवस्था बाधित झाल्याने पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने तातडीने मदतकार्याची यंत्रणा सक्रिय केली असून, महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (मंत्रालय, मुंबई) अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी विशेष ऑनलाइन व्यवस्था सुरू केली आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती जलदगतीने प्रशासनापर्यंत पोहोचावी आणि आवश्यक ती मदत वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी विशेष लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित नागरिकांचे कुटुंबीय, नातेवाईक किंवा मित्रपरिवाराने या लिंकवर जाऊन आवश्यक माहिती भरावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या माध्यमातून अडकलेल्या नागरिकांचे अचूक स्थान, त्यांची स्थिती आणि त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्यासाठी आवश्यक माहिती प्रशासनाला उपलब्ध होणार आहे. तसेच राज्य शासनाने परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले असून, संबंधित केंद्रीय यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नेपाळमधील पूरस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मदत मिळावी यासाठी मंत्रालयातील राज्य नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यात आला आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारची माहिती, मदत किंवा मार्गदर्शन हवे असल्यास राज्य नियंत्रण कक्षाच्या १०७० या टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांकावर किंवा +९१-९३२१५८७१४३ या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. तसेच controlroom@maharashtra.gov.in या अधिकृत ई-मेलवरही आवश्यक माहिती पाठवता येईल. प्रशासनाने माहिती नोंदविताना संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेलचे नाव, प्रवासाचा तपशील, तसेच कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो देण्याचे आवाहन केले आहे. या माहितीच्या आधारे प्रशासन अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधण्याचा आणि त्यांना आवश्यक ती मदत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, कोणताही नागरिक किंवा पर्यटक अडचणीत राहू नये यासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे ज्यांच्या नातेवाईकांचा किंवा परिचितांचा नेपाळ दौरा सुरू आहे, त्यांनी विलंब न करता शासनाने उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत लिंकवर माहिती नोंदवावी आणि आवश्यक असल्यास हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

