मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तीन एमपीएससी अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या या कटाचा शेवट प्रेमभंगानंतर झालेल्या तक्रारीतून झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, लोकेश उर्फ गौरव पाटील या तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. संबंधित तरुणी २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेला बसली होती. तिची निवड व्हावी या उद्देशाने गौरवने एमपीएससीमधील काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून परीक्षा होण्यापूर्वी प्रश्नसंचातील काही प्रश्न मिळवले. हे प्रश्न त्याने आपल्या प्रेयसीपर्यंत पोहोचवले. परीक्षेत संबंधित तरुणीने चांगले गुण मिळवत राज्यात सातवा क्रमांक मिळवला आणि औषध निरीक्षक पदावर निवड झाली. मात्र, नोकरी मिळाल्यानंतर तिने गौरवसोबतचे प्रेमसंबंध तोडल्याचे समोर आले. प्रेमभंगामुळे संतप्त झालेल्या गौरवने स्वतःच एमपीएससीकडे परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याची गुप्त माहिती दिली. या माहितीच्या आधारे एमपीएससीने प्राथमिक पडताळणी केली आणि पुढील तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. पोलिस उपायुक्त राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ अधिकारी मंगेश देसाई यांच्या विशेष पथकाने गौरवची चौकशी केली असता परीक्षा प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.
तपासादरम्यान मोबाइल फोनमधील संवाद, आर्थिक व्यवहार आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे एमपीएससीच्या काही अधिकाऱ्यांचा या कटात सहभाग असल्याचे उघड झाले. त्यानंतर गुन्हे शाखेने महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) अधिनियम, २०२४, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात एमपीएससीचे सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, अवर सचिव अभिजित लेंडवे आणि सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांना अटक करण्यात आली. याशिवाय नंदुरबार येथील कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण दिलीप पाटील, अमृत पाटील आणि लोकेश उर्फ गौरव राजेंद्र पाटील यांनाही अटक करण्यात आली आहे. तपासात असेही समोर आले की, तज्ज्ञांनी तयार केलेल्या मूळ प्रश्नसंचातून काही प्रश्न आधीच बाहेर काढून स्वतंत्र प्रश्नसंच तयार करण्यात आला होता आणि तो काही व्यक्तींना उपलब्ध करून देण्यात आला. या प्रकरणामुळे एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास सुरू असून पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, आर्थिक व्यवहार किती झाले आणि इतर उमेदवारांनाही प्रश्नपत्रिका पुरवण्यात आली होती का, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

