मुंबई : सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) व्यापक आणि नियोजनबद्ध कारवाईची तयारी सुरू केली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, यापुढे प्रत्येक सणासाठी स्वतंत्र आदेश काढण्याऐवजी वर्षभरातील सर्व प्रमुख सणांचा समावेश असलेली एकत्रित तपासणी योजना तयार करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक सणाच्या आधी, सणादरम्यान आणि सणानंतर कोणत्या प्रकारच्या तपासण्या आणि कारवाया करायच्या यासाठी चार टप्प्यांची स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश लवकरच जारी केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुंढे यांनी सांगितले की, सणासुदीच्या काळात मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मसाले, फराळाचे पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत काही ठिकाणी भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ विकले जातात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी उत्पादन प्रक्रिया, साठवणूक, गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तपासणी अधिक प्रभावी करण्यासाठी संबंधित सण सुरू होण्यापूर्वीच निरीक्षण मोहीम सुरू केली जाईल, जेणेकरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वेळीच कारवाई करता येईल.
तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, एफडीएची तपासणी केवळ सणासुदीपुरती मर्यादित नसून वर्षभर नियमितपणे सुरू असते. राज्यातील प्रत्येक खाद्य व्यवसायिकाने परवाना किंवा नोंदणी घेणे तसेच अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने (FSSAI) घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. सण कोणताही असो, अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. कारवाई करताना व्यवसायाचे स्वरूप, प्रतिष्ठा किंवा ठिकाण याचा कोणताही विचार केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. “पाचतारांकित हॉटेल असो, मोठे रेस्टॉरंट असो किंवा रस्त्यावरील छोटा स्टॉल अथवा ठेला असो, नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर समान पद्धतीने कारवाई केली जाईल,” असे मुंढे यांनी स्पष्ट केले. अन्न सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या कोणालाही सूट दिली जाणार नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या नव्या उपक्रमामुळे सणासुदीच्या काळात बाजारात विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता येईल, तसेच भेसळ रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांनाही बळ मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि नियमांनुसार तयार केलेले खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचेही तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

