मुंब्रा : गेल्या काही वर्षांपासून देशात धार्मिक ध्रुवीकरणाच्या घटना अधूनमधून समोर येत असताना, ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शहराने सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. हिंदू-मुस्लीम अशी संमिश्र लोकवस्ती असलेल्या मुंब्र्यात गणेशमूर्तीच्या वाहतुकीदरम्यान निर्माण झालेल्या संकटाच्या प्रसंगी मुस्लिम तरुणांनी पुढाकार घेत गणेशमूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी तब्बल चार तास अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या कृतीमुळे धार्मिक सौहार्दाचा आणि सामाजिक एकतेचा सकारात्मक संदेश संपूर्ण परिसरात पोहोचला. मुंब्र्यातील शंकर मंदिर परिसरात मार्कंडेय सेवा संस्था गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सुमारे २० फूट उंचीची भव्य गणेशमूर्ती साकारण्यात आली होती. ही मूर्ती भिवंडीतील पद्मानगर येथे उभारण्यात येणाऱ्या गणेशोत्सव मंडपात नेण्यासाठी ट्रॉलीद्वारे रवाना करण्यात आली होती. रविवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ट्रॉली मुंब्र्यातील दाभोळकर नाका येथे पोहोचली असता अचानक तिचे चाक तुटले. त्यामुळे ट्रॉली एका बाजूला कलंडू लागली आणि त्यावरील विशाल गणेशमूर्तीला इजा होण्याचा धोका निर्माण झाला. ही परिस्थिती पाहताच परिसरातील आरिफ सय्यद, बासीत शेख आणि शाहू यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिसरातील इतर तरुणांनाही मदतीसाठी बोलावले. सर्वांनी मिळून ट्रॉलीला आधार देत ती आणखी कलंडणार नाही, याची काळजी घेतली. त्यानंतर क्रेनची व्यवस्था करून गणेशमूर्ती अत्यंत सावधगिरीने ट्रॉलीवरून खाली उतरविण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान प्रत्येकाने संयम राखत मूर्तीला कोणतीही हानी होणार नाही, याची विशेष काळजी घेतली.
यानंतर नवीन ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली आणि क्रेनच्या साहाय्याने गणेशमूर्ती पुन्हा सुरक्षितपणे त्यावर चढविण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे चार तास लागले. पहाटे चारच्या सुमारास गणेशमूर्ती सुरक्षितपणे भिवंडीच्या दिशेने रवाना करण्यात आली. विशेष म्हणजे, मदतीचे काम पूर्ण झाल्यानंतर या मुस्लिम तरुणांनी गणेशमूर्तीसमोर श्रीफळ वाढवून सर्वधर्मसमभावाचा आणि सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश दिला. त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, मार्कंडेय सेवा संस्था गणेशोत्सव मंडळाने आरिफ सय्यद उर्फ पापा, बासीत शेख, शाहू आणि मदतीला धावून आलेल्या सर्व तरुणांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. संकटाच्या क्षणी धर्म, जात किंवा पंथ न पाहता माणुसकीला प्राधान्य देणाऱ्या या तरुणांनी सामाजिक सलोख्याचे आदर्श उदाहरण घालून दिल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. धार्मिक सण-उत्सवांमधून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मुंब्र्यातील या घटनेने चोख उत्तर दिले आहे. परस्पर सहकार्य, विश्वास आणि बंधुभाव यांच्या बळावर कोणतेही संकट सहजपणे पार करता येते, याची प्रचिती या प्रसंगातून आली. गणेशोत्सवासारख्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे मुंब्रा शहराच्या सामाजिक एकतेच्या परंपरेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून, ही घटना समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

