नवी दिल्ली : ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजीत दिपके यांनी ५ सप्टेंबर रोजी दिल्लीत जंतरमंतरपेक्षाही मोठे आंदोलन उभारण्याचा दावा केला आहे. यापूर्वी जंतरमंतर येथे आंदोलन करून सरकारकडून काही आश्वासने मिळाली होती. मात्र, त्यांची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या पक्षाच्या वतीने केवळ दिल्लीतच मुख्य आंदोलनाचे नियोजन करण्यात आले असून, देशभरातील इतर ठिकाणी आंदोलनांना पाठिंबा म्हणून निदर्शने झाल्यास त्यातून या आंदोलनाला अधिक बळ मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आंदोलक विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे अद्याप मागे घेण्यात आलेले नाहीत, तसेच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना जाहीर केलेली मदतही मिळालेली नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली. गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार न्यायालयाचे कारण पुढे करत असले, तरी न्यायालयाने सरकारला केवळ संबंधितांची यादी सादर करण्यास सांगितले असूनही ती यादी अद्याप दिली जात नसल्याचा दावा दिपके यांनी केला. त्यामुळे सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्यामुळे पुन्हा मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी देशातील विविध राज्यांतील विद्यार्थी, आदिवासी समाजातील युवक आणि विविध संघटनांचा पाठिंबा मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी झालेल्या आंदोलनापेक्षा यावेळी अधिक मोठा जनसमुदाय सहभागी होईल, असा दावा त्यांनी केला.
यावेळी अभिजीत दिपके यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओत वांगचुक यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’वर टीका केल्याचा दावा केला जात असला, तरी तो व्हिडिओ अपूर्ण असल्याचे दिपके यांनी म्हटले. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यास सोनम वांगचुक यांनी या तरुणांचे कौतुकच केले असून, ते सध्याच्या अनेक राजकीय नेत्यांपेक्षा अधिक चांगले आणि प्रामाणिक असल्याचे म्हटल्याचा दावा त्यांनी केला. पुढे काय होईल हे सांगता येत नसले, तरी या तरुणांमध्ये भ्रष्टाचाराची प्रवृत्ती दिसत नसल्याचे वांगचुक यांनी नमूद केल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोलताना सरकारच्या धोरणांवर त्यांनी टीका केली. समाजातील युवकांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाल्या असत्या, तर आंदोलन करण्याची वेळच आली नसती, असे ते म्हणाले. सरकारच्या अपयशामुळेच राज्यात विविध समाजघटकांना रस्त्यावर उतरावे लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आपण पाठिंबा देणार असून, त्यांच्या भेटीसाठी स्वतः जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जंतरमंतर आंदोलनावेळी सरकारने ३५ दिवस आंदोलकांना प्रतीक्षा करायला लावली होती, तशी परिस्थिती मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत निर्माण करू नये. सरकारने त्यांच्यासोबत तातडीने चर्चा करून तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय बॉम्बे उच्च न्यायालयाच्या टायपिंग परीक्षा रद्द झाल्याच्या प्रकरणावरही त्यांनी भूमिका मांडली. परीक्षेदरम्यान संगणक, की-बोर्ड आणि इतर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. आपण केवळ विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिलो होतो आणि परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या संघर्षामुळेच झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात ज्या परीक्षा केंद्रांवर वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होतात, त्या केंद्रांवर परीक्षा घेऊ नयेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

