मुंबई : रक्षाबंधन हा सण केवळ भाऊ-बहिणीच्या रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून प्रेम, विश्वास, आपुलकी, काळजी आणि संरक्षणाचा अतूट धागा आहे, अशी भावना व्यक्त करत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी महापौर निवासस्थानी कार्यरत कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधनाचा सण कौटुंबिक वातावरणात साजरा केला. भायखळा येथील महापौर निवासस्थानी शुक्रवारी (२८ ऑगस्ट २०२६) आयोजित या विशेष कार्यक्रमात आमदार चित्राताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. महापौर तावडे म्हणाल्या की, दिवस-रात्र नागरिकांच्या सेवेसाठी आणि महापौर बंगल्याच्या कामकाजासाठी सातत्याने मेहनत घेणारे सर्व कर्मचारी हे आमच्या कुटुंबाचाच एक अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे रक्षाबंधनासारखा सण त्यांच्यासोबत साजरा करणे ही आनंदाची आणि समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. सण-उत्सवाच्या काळातही कर्तव्यावर तत्पर राहून जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी महापौर रितू तावडे आणि आमदार चित्राताई वाघ यांनी सर्व कर्मचाऱ्यांना स्वतः राखी बांधली, औक्षण केले आणि त्यांच्या उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी तसेच दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात उपस्थित कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत महापौरांनी दाखविलेल्या आपुलकीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सणाचा आनंद, परस्परांतील विश्वास आणि कुटुंबवत्सल वातावरण जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. महापौर बंगल्यातील कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनीही एकमेकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत हा सण उत्साहात साजरा केला. सण-उत्सवांमधून सामाजिक सलोखा, परस्पर सन्मान आणि सेवाभाव अधिक दृढ होतो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. महापौर निवासस्थानी झालेल्या या साध्या पण भावनिक सोहळ्याने कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींमधील आत्मीयतेचे नाते अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

