रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावरील तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असताना, गडावरील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महिला पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांची दुरवस्था असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या मुद्द्याने जोर धरला आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) शिष्टमंडळाने रायगडावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीनंतर गडावरील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा अत्यंत अपुऱ्या असल्याचा आरोप करत ६ जूनपूर्वी परिस्थितीत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त आणि पर्यटक रायगडावर येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, गडावरील पर्यटकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे मुख्य पायरी मार्ग पुन्हा खुला करण्यात आला आहे. किल्ल्याच्या परिसरातील काही कड्यांवरील सैल आणि धोकादायक दगड हटविण्याच्या कामासाठी ३० आणि ३१ मे रोजी हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या या कामानंतर संबंधित विभागाने मार्गाची तपासणी पूर्ण केली असून आजपासून पर्यटकांना पुन्हा पायऱ्यांमार्गे गडावर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. आगामी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने सुरक्षा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत गडावरील सुविधा सुधारण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
