वृत्तसंस्था : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट, ‘ मिर्झा एक्सप्रेस ‘ फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज २८ नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी ६.३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. यवतमाळ जिल्ह्यातील नेर हे त्यांचे मूळ गाव आहे. सध्या अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात ‘ मिर्झा एक्सप्रेस ‘ या घरात त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी फातेमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज, महाजबी व हुमा या दोन सुविद्य कन्या आहेत. त्यांच्यावर अमरावती येथील ईदगा कब्रस्तानात दुपारी दोन नंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले डॉ. मिर्झा रफी अहमद बेग आपल्या खुमासदार सादरीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. त्यांचे एकूण २० काव्यसंग्रह असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी आपल्या ‘मिर्झा एक्सप्रेस ‘ या काव्य मैफिलीचे ६ हजारावर सादरीकरण केले आहे.

