ठाणे : इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना मराठी विषयाचे उत्तम शिक्षण मिळाले तर, इंग्रजी माध्यमात मुले शिकत आहेत, याची काळजी आपल्याला राहणार नाही, असे मत न्यायमूर्ती अभय ओक यांनी मांडले. ज.ए.इ चे मोह विद्यालय, रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे आणि अभिरुची मंडळ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी आणि माजी न्यायमूर्ती अभय ओक हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
सर्वोच्च न्यायालयात मी स्वतः आणि माझे ज्येष्ठ सहकारी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई आम्हा दोघांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. मराठी माध्यमातून शिक्षण झाले म्हणजे न्यूनगंड बाळगायची गरज नाही. मला अनेकजण विचारतात की, मुंबई आणि कर्नाटक उच्च न्यायालय असो वा सर्वोच्च न्यायालय याठिकाणी काम करताना इंग्रजीतून परिपत्र लिहावी लागतात. तर, तुम्हाला कधी भाषेची अडचण आली का, तेव्हा मी प्रत्येकाला सांगतो की, माझ्या शाळेने मला अतिशय चांगले असे इंग्रजी भाषेचे शिक्षण दिले. शाळेत असताना शिक्षकांनी आमचे इंग्रजी व्याकरण खूप पक्के करुन घेतले आहे. आज इंग्रजी माध्यमाचा पगडा निर्माण झाला आहे, असे म्हटले जाते. सगळी मुले इंग्रजी माध्यमाकडे धाव घेतात. खरंतर ही काळाची गरज आहे. परंतू, जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून मुल शिक्षण घेत असली तरी, या इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मराठी मुलांना मराठी भाषेचे अतिशय चांगले शिक्षण दिले पाहिजे, असे माजी न्यायमूर्ती अभय ओक म्हणाले.
