वृत्तसंस्था : हिवाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये, असा प्रश्न अनेकांना पडतो. हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामध्ये केळी खाल्ल्यास सर्दी-खोकला, असे आजार होण्याची भीती अनेकांना वाटते. बरेच जण शक्यतो हिवाळ्यात केळी खाणे टाळतात. त्यामुळे या दिवसात केळी खाणे हानीकारक आहे की फायद्याचे, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जळगावमधील जे.पी.पी प्राकृतिक चिकित्सा आणि योग केंद्रांच्या संस्थापक आहार तज्ज्ञ डॉ. सोनल महाजन यांच्याशी संवाद साधला.
मध्यम आकाराच्या एका केळीत साधारणपणे २८ ग्रॅम कार्बोदके, १५ ग्रॅम नैसर्गिक शर्करा, एक ग्रॅम प्रथिने आणि तीन ग्रॅम चोथा (फायबर) असतो. आणि त्यापासून जवळपास १०५ कॅलरीज उष्मांक मिळतात. त्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी केळी प्रभावी ठरते. केळीत वसा (फॅट) अत्यल्प प्रमाणात म्हणजे जवळजवळ नगण्य असल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास हे फळ सहाय्यक ठरू शकते. केळीत असलेल्या मँगनिजमुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, तर त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यासही ते उपयुक्त आहे. आयुर्वेद व निसर्गोपचार पद्धतीनुसार केळीतील पोटॅशियम, मँगनीज, फॉस्फरस यांसारखी खनिजे तसेच जीवनसत्त्व क आणि ब-सहा यांचे शरीराच्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक स्वास्थ्यावर सकारात्मक परिणाम होतात. नियमित व्यायाम करणारे तसेच क्रीडा प्रकारांसाठी तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये केळीचे सेवन वाढल्याचेही आढळून येते, असे मत डॉ. सोनल महाजन यांनी व्यक्त केले.

