रत्नागिरी : सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. ही सगळी चर्चा सुरु असताना भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा मानस व्यक्त केलेला आहे.
गेल्या काही महिन्यात निलेश राणे यांचे गुहागरमधील दौरे वाढले होते. त्यांची गुहागरमधील सभाही प्रचंड गाजली होती. तेव्हापासूनच निलेश राणे हे गुहागर विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भास्कर जाधव यांचा विजय झाला होता. त्यामुळे ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेवरुन श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मेहुण्याला रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु केली आहे.
श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम हे यंदा गुहागरमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असू शकतात. विपुल कदम हे खेडमधील तळे गावचे रहिवासी आहेत. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गुहागरमधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत गुहागर विधानसभेसाठी विपुल कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. पितृपक्ष संपल्यानंतर शिंदे गटाकडून विपुल कदम यांच्या नावाची घोषणा होईल, असं सांगितले जातं. तसं घडल्यास निलेश राणे यांचे गुहागरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगणार आहे. त्यामुळे राणे कुटुंबीय आणि भाजप पक्षाकडून विपुल कदम यांच्या उमेदवारीबाबत काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहावे लागेल.
खासदार श्रीकांत शिंदे यांचा मेहुणा विपुल कदम यांची गुहागरमधून उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची माहिती काही समोर येत आहे. विपुल कदम रिंगणात उतल्यास गुहागरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगेल. याठिकाणी ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचवेळी भाजपकडून माजी आमदार विनय नातू हे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विपुल कदम यांच्या उमेदवारीमुळे या जागेवरुन भाजप आणि शिंदे गटात पेच निर्माण होऊ शकतो.