वृत्तसंस्था : भारतातील प्रसिद्ध जाहिरात गुरू पियुष पांडे यांचं निधन झालं आहे. ते ७० वर्षांचे होते. त्यांनी जाहिरातींच्या विश्वात नवे रंग भरत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अनेक अॅड कॅम्पेन चर्चेत राहिल्या, ज्यामुळे ब्रँड घराघरात प्रसिद्ध झाले. उदाहरणार्थ, त्यांनी एशियन पेंट्ससाठी “हर खुशी में रंग लाये” हे कॅम्पेन स्लोगन लिहिलं. कॅडबरी जाहिरात “कुछ खास है” देखील त्यांनी लिहिली. इतकंच नाही तर त्यांनी ८०,९० च्या दशकात दूरदर्शन चॅनेलवरुन प्रसारित होणारं प्रसिद्ध “मिले सूर मेरा तुम्हारा” हे गाणें देखील लिहिलं होतं, जे भारताच्या विविधतेतील एकतेचा गौरव करणारं होतं. हे गाणं दूरदर्शनचे थीम साँग बनलं.नंतर इंटरनेटच्या काळात YouTube वरुन हे गाणं ऐकलं जाऊ लागलं. त्यांनी फेविकॉल आणि हच सारख्या कंपन्यांसाठी अनेक यशस्वी जाहिरात कॅम्पेनेचं नेतृत्व देखील केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी त्यांनी प्रचाराची घोषणाही लिहिली, जी खूप लोकप्रिय झाली. ही घोषणा होती “अबकी बार, मोदी सरकार.” पियुष पांडे हे भारतातील जाहिरात उद्योगात मोठे बदल घडवून आणण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी जवळजवळ चार दशके प्रसिद्ध जाहिरात कंपनी ओगिल्वी इंडियासोबत काम केलं. ही कंपनी भारतातील जाहिरात विश्वासाठी एक पर्याय ठरली. पियुष पांडे यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असं मानलं जातं. त्यांच्या निधनाने जाहिरात जगतातील एका युगाचा अंत झाला आहे. त्यांच्या शानदार मिशा आणि आनंदी चेहरा नेहमीच लक्षात राहील. त्यांना भारतातील भाषा आणि परंपरांची सखोल समज होती. त्यामुळेच त्यांच्या अनेक कॅम्पेन लोकांच्या मनाला भिडल्या. प्रोडक्ट लोकप्रिय होत असताना, त्यांनी तयार केलेल्या जाहिरातींनीही खूप लक्ष वेधले आणि लोक त्या मोठ्या आवडीने पाहत राहिले. पियुष पांडे १९८२ मध्ये ओगिल्वी इंडियामध्ये सामील झाले. त्यापूर्वी ते क्रिकेटपटू होते. त्यांनी चहाच्या बागायती आणि बांधकाम क्षेत्रातही काम केलं होते. त्यांनी वयाच्या २७ व्या वर्षी जाहिरात क्षेत्रात प्रवेश केला आणि इंग्रजी भाषेचे वर्चस्व असलेल्या जाहिरातींच्या जगात बदल घडवून आणला. त्यांनी एशियन पेंट्स आणि कॅडबरीसह अनेक कंपन्यांच्या कॅम्पेनना नवीन उंचीवर नेले.

