ठाणे : उल्हासनगरमध्ये निवडणूक वातावरण तापलेले असताना मंगळवारी प्रचाराची सांगता झाली. मात्र त्याचवेळी तब्बल ५० लाखांची रोकड आढळल्याने शहरात खळबळ माजली आहे. सुभाष टेकडी परिसरातील आंबेडकर चौकात समाजसेवक नरेश गायकवाड यांच्या सतर्कतेमुळे संशयास्पद हालचाल उघडकीस आली पर्दाफाश आणि भरारी पथकाच्या कारवाईत तब्बल ५० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. निवडणुकीत पैसे वाटपासाठी ही रक्कम वापरली जाणार असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या प्रकरणाने अधिक तपास सुरू आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रकिया पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत राज्यातील दोन प्रमुख पक्ष एकमेकांविरुद्ध रिंगणात आहेत. त्यामुळे चुरस वाढली आहे. एकमेकांवर सुरू असलेली चिखलफेक मंगळावर सायंकाळी शांत झाली. त्यानंतर प्रचार थांबला. मात्र आता वैयक्तिक भेटीगाठीवर आणि एकमेकांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते आहे. लक्ष्मी दर्शनाचा योग्य घडवण्यासाठी काही हालचाली सुरू असल्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क आहे. त्यातच मंगळवारी रोख रक्कम आढळल्याने खळबळ उडाली. सुभाष टेकडी भागात निवडणूक आचारसंहिता लागू असतानाच ही कारवाई करण्यात आली. संशयास्पद बॅग पाहताच समाजसेवक नरेश गायकवाड यांनी प्रशासनाला तत्काळ माहिती दिली. त्यानंतर विठ्ठलवाडी पोलीस आणि भरारी पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान बॅगेत ५० लाखांची रोकड असल्याचे समोर आले. प्राथमिक माहितीप्रमाणे ही रक्कम एका रिक्षातून वाहतूक केली जात होती. संबंधित रिक्षा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशीसाठी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात नेले.

