ठाणे : वांद्रे पूर्वेतील गरीब नगर परिसरातील हजारो झोपड्यांवर नुकतीच मोठी कारवाई करण्यात आल्यानंतर आता मध्य रेल्वेच्या जागांवरील अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मध्य रेल्वेच्या विविध विभागांमधील लाखो चौरस मीटर जमीन हजारो झोपड्या आणि अनधिकृत बांधकामांनी व्यापल्याचे समोर आले असून, याबाबत ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, मध्य रेल्वेच्या मालकीच्या ५ लाख चौरस मीटरहून अधिक जमिनीवर तब्बल १६ हजार ३० पेक्षा अधिक झोपड्या आणि इतर अनधिकृत बांधकामे उभी आहेत. कुर्ला-ट्रोम्बे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात अतिक्रमणांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे रेल्वेच्या नोंदीत नमूद करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी रेल्वेच्या आरक्षित जागांवर झोपड्या, दुकाने, गाळे आणि इतर व्यावसायिक बांधकामे उभारण्यात आली आहेत. काही भागांत रेल्वे रुळालगतच झोपड्यांची साखळी निर्माण झाल्याने सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
कुर्ला-ट्रोम्बे परिसरात सर्वाधिक ५,५९५ झोपड्यांनी सुमारे ५० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक जमीन व्यापली आहे. तर कल्याणमध्ये ३,१६० झोपड्यांमुळे २.३५ लाख चौरस मीटरहून अधिक क्षेत्र अतिक्रमणाखाली गेले आहे. डोंबिवली परिसरात २,९०२ झोपड्यांनी जवळपास एक लाख चौरस मीटर जमीन व्यापली असून भायखळा, ऐरोली, कसारा, विक्रोळी आणि ठाणे परिसरातही मोठ्या प्रमाणात रेल्वे जमीन अतिक्रमणाखाली आहे. विशेष म्हणजे, भविष्यात अतिरिक्त रेल्वेमार्ग, स्थानक विस्तार आणि इतर महत्त्वाच्या विकासकामांसाठी राखीव ठेवलेल्या जागांवरच अतिक्रमणांचे जाळे वाढत असल्याने अनेक प्रकल्प रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गरीब नगरमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करणारे प्रशासन रेल्वेच्या हजारो झोपड्यांबाबत मात्र अद्याप ठोस पावले का उचलत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रेल्वेच्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर वर्षानुवर्षे अतिक्रमणे वाढत असताना जबाबदार यंत्रणा नेमकी काय करत होती, याबाबतही चर्चा रंगली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि संबंधित यंत्रणा या अतिक्रमणांवर व्यापक मोहीम राबविणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- कुर्ला-ट्रॉम्बे : ५,५९५ झोपड्या
- कल्याण : ३,१६० झोपड्या
- डोंबिवली : २,९०२ झोपड्या
- भायखळा : ८०० झोपड्या
- ऐरोली : ७९४ झोपड्या
- कसारा : ५५९ झोपड्या
- घाटकोपर-विक्रोळी : ४१३ झोपड्या
- ठाणे : ३६५ झोपड्या
